आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या वर्षी २५ जून रोजी राज्य व्यापणारा मान्सून यंदा १४ जूनलाच राज्यभर सक्रिय झाला आहे. मान्सूनने रविवारी मुंबईसह महाराष्ट्र व्यापत गुजरात, मध्य प्रदेशात प्रवेश केला. २०१९ मध्ये २५ जूनला मान्सून मुंबईत दाखल झाला होता. यंदा राज्यात १४ जूनअखेर सरासरीच्या ८९% जास्त पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व हवामान विभागांत सरासरीहून जास्त पावसाची नोंद झाली आहे. यंदा १ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ आले. निसर्गमुळे कर्नाटकपर्यंत येऊन मान्सून काहीसा रेंगाळला व ११ जून रोजी तळकोकणात दाखल झाला. त्यानंतर मान्सूनने वेगाने प्रगती करत १४ जून रोजी महाराष्ट्र व्यापत गुजरातमध्ये प्रवेश केला. राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे.
६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस असेल तरच पेरणी करा
आपल्या भागात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पेरणी करा. कमी पावसात पेरणीची घाई केल्यास व नंतर पावसात खंड पडल्यास पेरणी वाया जाण्याची शक्यता असते म्हणून ६५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. - डॉ. सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक, राष्ट्रीय कृषी प्रकल्प, औरंगाबाद
सर्व विभागांत दमदार पाऊस
मध्य महाराष्ट्र : यंदा १४ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र हवामान विभागातील सांगली वगळता सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला आहे.
मराठवाडा : आठपैकी सात जिल्ह्यांत जोरदार पाऊस. नांदेडला सरासरीपेक्षा कमी पाऊस.
विदर्भ : विभागातील ११ पैकी चंद्रपूर, गडचिरोली,वर्धा आणि वाशीम वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.
एक ते १४ जूनपर्यंत सर्व विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.