आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या २८ वर्षांपासून दिव्यांगाची सेवा करणाऱ्या महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेला दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संस्था हा पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत गौरवण्यात आले. संस्थेचे सचिव विजय कान्हेकर यांनी शनिवारी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारला. आतापर्यंत या संस्थेने १ लाखाहून अधिक दिव्यांग, वृद्धांना मोफत साधनांचे वितरण केले आहे.
१९९४ मध्ये परभणीत महात्मा गांधी सेवा संघाची स्थापना झाली. नंतर २००५ मध्ये औरंगाबादेत मुख्यालय उभारले. नंतर पुणे, हिंगोली, नागपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नांदेड, बीड व परभणी, दक्षिण गोवा या भागातही केंद्राची शाखा स्थापन करून कॅम्पद्वारे कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण केले. मोबाइल व्हॅनद्वारे तांडे-वस्तीवरील दिव्यांगांनाही सुविधा दिली जात आहे. अकोला जिल्ह्यात १५ लाखांहून अधिक लोकांच्या घरी सर्वेक्षण करून ५० हजार दिव्यांगांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे मॅपिंग केेले.
मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, बिहारमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचा पुरवठा करून सक्षमीकरणासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्याचा विचार करून या संस्थेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी संस्थेचे पदाधिकारी शशिकांत देशपांडे (जोगवाडकर), मुख्याधिकारी अमेय अग्रवाल, व्यवस्थापक सतीश निर्मळ व समन्वयक देविदास कान्हेकर, समृद्धी कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.