आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यात शहरातील जुन्या व धोकादायक इमारती पडून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मनपा प्रशासनाने ५० धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दिली. मागील वर्षी पावसाळ्यात मुंबईच्या मालाड भागातील चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर औरंगाबाद शहरातील धोकादायक इमारतींचा विषय समोर आला. त्या वेळी प्रशासनाने सर्वेक्षण करून धोकादायक असलेल्या ४८ इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. यंदा काही दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून प्रभागनिहाय नोटिसा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धोकादायक इमारती, मोडकळीस आलेला इमारतींचे सर्वेक्षण करून मनपाच्या अतिक्रमण विभागाने ५० इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. जुन्या शहरातील गुलमंडी, कासारी बाजार, पानदरिबा, धावणी मोहल्ला, शहागंज, दिवाण देवडी, रंगारगल्ली, सिटी चौक, दलालवाडी, पैठण गेट, औरंगपुरा तसेच सातारा -देवळाई भागात धोकादायक इमारती आहेत. या इमारती प्रभाग १, २ व ९ कार्यालयांतर्गत येतात. कलम २६४ नुसार नोटीस मनपाने ५० धोकादायक इमारतींना कलम २६४ नुसार नोटीस बजावून धोक्याची सूचना दिली आहे. नागरिकांनी इमारतीचा मोडकळीस आलेला भाग पाडून टाकावा किंवा दुरुस्ती करावी. काही इमारतीत मालक, भाडेकरू असा वाद बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे, तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. - रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.