आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठरवल्यास ते कुठेही पूल बांधू शकतात. भाजप-शिवसेना यांच्यातही तेच पूल बांधू शकतात, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. तसेच रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद उत्तम प्रकारे सांभाळू शकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सत्तार यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेना-भाजप यांच्यात पडद्यामागे काही शिजतेय का, अशी नव्याने चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांना एका कामाच्या संदर्भात भेटण्यासाठी सत्तार राजधानी दिल्लीत गेले होते. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी भाजप-शिवसेना युतीचे संकेत दिले आहेत. “नितीन गडकरी देशाच्या राजकारणातले एक चालतेबोलते विद्यापीठ आहे. गडकरीसाहेब हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवले की ते कुठेही, कसाही पूल बांधू शकतात. पूल कसा बांधायचा, कसा जोडायचा, त्यासाठी काय काय करायला हवे, हे त्यांना चांगले माहिती आहे. देशात त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला आहे. भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचे त्यांनी मनावर घेतले तर ते उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील. कारण शेवटी भाजप-शिवसेना युतीचा निर्णय उद्धवसाहेबच घेऊ शकतात,” असे सत्तार म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे कारभार सोपवावा, असे विधान अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते, हे विशेष. त्यापाठोपाठ सत्तार यांचे हे वक्तव्य आले आहे.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्री ? : रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, असे सांगताना सत्तार म्हणाले की, रश्मीताईंची काम करण्याची पद्धत एका अभ्यासू महिलेसारखी आहे. अभ्यासू महिलांचे नियोजन असते. आज त्या पडद्यामागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असते. कारण त्या साहेबांच्या सोबत असतात. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे, हे त्या जाणून आहेत,असे सत्तार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.