आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेविरोधात सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गंगापूर रोड येथील शहीद चौकात सकाळी निदर्शने करून निषेध केला. ‘अग्निपथ योजना वापस लो, तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. तर पुणे येथेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन करत मोदी सरकार ‘मर जवान, मर किसान’, अशी कामगिरी करत असल्याचा आरोप केला.
नाशिकमध्ये आंदोलक कार्यकर्त्यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, फक्त चार वर्षांच्या कंत्राटावर तरुणांना नोकरीवर घेणे, हे अयोग्य असून त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी कमी करून सहा महिने करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती आहे. या निर्णयामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढेल. हाताला काम नसल्याने प्रशिक्षण घेतलेले तरुण देशविरोधी कारवाई करण्याची भीती आहे.
मोदीजींचा नारा ‘मर जवान, मर किसान’
‘अग्निपथ’ योजनेवरून युवकांमध्ये संपूर्ण देशभर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून सुमारे १४ राज्यांतील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना केंद्र सरकारने कोणत्याही समाजघटकांशी चर्चा न करता नेहमीप्रमाणे अतिशय घाईघाईने रेटली आहे. परंतु यामुळे सैन्यदलासारख्या अतिशय महत्त्वाच्या संस्थेवर आघात होत असल्याची टीका पुणे येथे आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा युद्ध स्मारक कॅम्प येथे आंदोलन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.