आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यवसायात गुणवत्ता आणि सातत्य राखल्यास छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या स्टार्टअप्सचे रूपांतर मोठ्या उद्योग समूहात होऊ शकते. त्यामुळे समाजाची गरज ओळखून त्यावर योग्य उपाय देता येणे हेच व्यवसायाच्या यशाचे गमक आहे, असे मत चितळे उद्याेगाचे संचालक गिरीश चितळे यांनी व्यक्त केले. मॅजिकतर्फे सीएमआयए सभागृहात आयोजित लर्न नेक्स्ट कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, सीएमआयए शिवप्रसाद जाजू, मॅजिकचे संचालक प्रसाद कोकीळ, रितेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. चितळे म्हणाले, ८५ वर्षांपूर्वी दुधाच्या विक्रीतून चितळे ग्रुपच्या व्यवसायाला सुरुवात केली होती.
अगदी छोट्या स्वरूपातील व्यवसाय आज भरभराटीला अाला आहे. यामागे गुणवत्ता, सातत्य आणि नीतिमत्ता ही त्रिसूत्री आहे. व्यवसायातील यशात आपल्या उत्पादनाचे सर्वोत्कृष्ट सूत्रीकरण करणे आणि ते सातत्य टिकवणे खूप महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. ४० देशांत उत्पादन निर्यात : आज चितळे समूहाने डेअरी उत्पादन, बाकरवडी, श्रीखंड आणि मिठाई अशी शंभरहून अधिक उत्पादने विकसित केली आहेत. चितळे ग्रुप सध्या जगातील ४० देशांत उत्पादन निर्यात करतो. सुरुवातीला बाकरवडी प्रतिदिन १०० किलो तयार करण्याची क्षमता होती. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ६ टन प्रतिदिनपर्यंत ही क्षमता वाढली आहे. नजीकच्या काळात ही क्षमता १२ टन नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चितळे यांनी सांगितले. आशिष गर्दे म्हणाले, मॅजिकतर्फे नवउद्योजक, विद्यार्थी, महिला उद्योजकांसाठी नियमित उपक्रम राबवले जातात. यात लर्न नेक्स्टमध्ये नामांकित तज्ज्ञ मंडळीना संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले जाते. विविध उपक्रम, सीड फंडिंग सपोर्ट, इनोव्हेशन चॅलेंज आणि इनक्युबेशन साहाय्य यांच्या माध्यमातून स्टार्टअप इकोसिस्टिम विकसित करण्याकरिता प्रयत्न केले जातात. मॅजिकचे सीईओ रोहित औटी यांनी सूत्रसंचालन केले. मॅजिकचे संचालक रितेश मिश्रा यांनी आभार मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.