आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा साडेचार कोटी होणार जमा:‘धान्याऐवजी पैसे’साठी 75 हजारांपैकी 25 हजार शेतकऱ्यांनी दिली कागदपत्रे

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या धान्याऐवजी त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रतिव्यक्ती दीडशे रुपये महिन्याला संबंधित व्यक्तीच्या खात्यावर टाकण्यात येणार आहेत. छत्रपती संंभाजीनगर जिल्ह्यात ७२,६०० शेतकरी कुटुंबांपैकी केवळ २५ हजार जणांनीच त्यांची कागदपत्रे जमा केली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरमहा साडेचार कोटी रुपये जमा होणार आहेत.

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत २४ जुलै २०१५पासून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येतो. मात्र, फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य सरकारने आता धान्याऐवजी थेट ‘डीबीटी’च्या माध्यमातून त्यांच्या खात्यात दरमहा दीडशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या योजनेचे ७२,६०० कुटुंबांतील ३ लाख २५ हजार लाभार्थी आहेत.

कागदपत्रे सादर केल्यानंतर जमा होणार पैसे याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी सांगितले की, आतापर्यंत २५ हजार शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रे जमा केली आहेत. कागदपत्रे जमा करणाऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केला जाईल. उर्वरित शेतकऱ्यांचा निधी रेशन कार्डची झेरॉक्स, खाते क्रमांक, आधार कार्ड, संबंधित फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जानेवारीपासूनची ही रक्कम दिली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे जमा करावीत.