आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना व संभाजीनगर जिल्ह्यात आज केलेल्या पीक नुकसानीच्या पाहणीत अनेक ठिकाणी पंचनामेच झाले नसल्याचे समोर आले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले असतानाही अद्याप पंचनामेच झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी दानवे यांना सांगितले. गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात पाऊस झाला.
दानवे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढोपटेश्वर शिवार येथील शेतकरी नाथाराम शेळके यांच्या शेतातील डाळिंब फळांचे नुकसानाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमनी वाहेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी साईनाथ तांगडे यांच्या शेतातील बांधावर जाऊन गहू, हरभरा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. पिके हाताला आलेली असताना अवकाळी पावसामुळे डाळींब, मोसंबीच्या फळबागा व हरभरा, गहू आदी पिके आडवी झाली आहेत. आता दुसरे पीक घेण्यासारखीही स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ३३ टक्के नुकसानीचे निकष न लावता सरसकट मदत द्यावी, अशा सूचना दानवे यांनी संबंधित तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिल्या.
एकीकडे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. सततच्या पावसाची मदत अद्याप मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी तहसीलदार सुमन मोरे व शिवसेना पदाधिकारी माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.