आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामनगर नव्हे, सर्कसनगर!:सातारा-देवळाईवासीयांची व्यथा ; फक्त 300 मीटरच्या अंतरासाठी दररोज 3 ते 6 किलोमीटरचा मारावा लागतोय फेरा

छत्रपती संभाजीनगर / फिरोज सय्यद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुलाखालचा रस्ता पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. सकाळ-संध्याकाळ शहरात शाळा-महाविद्यालयात तसेच कामासाठी जावेच लागते. आजारपणावरील उपचारासाठी शहरात जाण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यात संग्रामनगर उड्डाणपूल आणि आमदार रोडशेजारील खोदून ठेवलेले खड्डे, मातीच्या ढिगाऱ्यांवरून वाट काढता काढता नाकी नऊ येतात. प्रशासनाकडून फक्त मुदत देणे सुरू. ही काही एखाद्या आदिवासी पाड्याची कथा नाही, तर शहराजवळील सातारा-देवळाईवासीयांची व्यथा आहे.

सातारा-देवळाईवासीयांसाठी शहराशी जोडणारा पूल म्हणजे संग्रामनगरचा उड्डाणपूल. बीड बायपास रोडवर तयार करण्यात आलेला उड्डाणपूल उंचीमुळे वादात असताना त्याखाली खड्डे करून रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची शहानिशा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे चित्र दिसले. पूर्वी आमदार रोड ते संग्रामनगर उड्डाणपुलापर्यंत तीनशे मीटरच्या जवळपास अंतर कापल्यानंतर शहराशी संपर्क होत होता. परंतु उड्डाणपुलाखालील रस्त्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे एकीकडे पुलावरून निशांत पार्क हॉटेलमागील भागातून संग्रामनगर रेल्वे पुलाखालून किमान तीन किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत होता. आता निवासी भागातील रस्त्यांमधून वाट काढावी लागते. दुसरीकडे देवळाई-शिवाजीनगरमार्गे जायचे असल्यास किमान सहा किमी अंतराचा वळसा घ्यावा लागतो. अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात संग्रामनगर उड्डाणपुलावर टाकण्यात आलेल्या तसेच आमदार रोडशेजारील मातीच्या ढिगाऱ्यांवरून वाहने नेताना वाहनधारकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे. या संघर्षमय प्रवासामुळे पाठीचा त्रास, मानेचा त्रास व मणक्याचे आजार सुरू झाले आहेत.

मणक्याचा त्रास सुरू दररोज खडतर प्रवास करावा लागतो. पायी असो अथवा खड्डे, मातीचे ढिगारे यातून वाट काढावी लागते. त्यामुळे मणक्याचा त्रास सुरू झाला आहे. धुळीचा त्रास होतो तो वेगळाच. -सुनीता पवार, रहिवासी

वळसा घालावा लागतो दररोज किमान एका बाजूने तीन ते सहा किमीचा प्रवास करावा लागतो. एकूणच सहा ते बारा किमीचा वळसा घालून ये-जा करावी लागते. धुळीमुळे श्वासाचा त्रास वाढला आहे. - डॉ. आनंद लोंढे, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...