आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:मराठवाडा- विदर्भात शेतकरी संघटनेचे नेते ‘बीआरएस’च्या गळाला‎; मविआला निवडणुकीत बसू शकेल फटका

प्रवीण ब्रह्मपूरकर | छत्रपती‎ संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.‎ चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र‎ समिती (बीआरएस) पक्षामध्ये‎ प्रवेशाचे सोहळे घेतले जात आहेत.‎ शरद जोशी यांच्या शेतकरी‎ संघटनेमधील पदाधिकाऱ्यांना‎ ‘बीआरएस’ने मोहिनी घातल्याचे चित्र‎ आहे. शेतकरी संघटनेचे अनेक‎ पदाधिकारी या पक्षात गेले आहेत.‎ त्याचबरोबर किमान दोन ते तीन पक्ष‎ फिरून आलेले पुढारी देखील या‎ पक्षात प्रवेश करत आहेत.‎ आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या‎ पक्षाची तेलंगणात ‘एमआयएम’सोबत‎ युती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात‎ ‘एमआयएम’ला वंचित बहुजन‎ विकास आघाडीनंतर ‘बीआरएस’चा‎ पर्याय उपलब्ध झाला आहे.‎

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये‎ कापूस, सोयाबीन, सरकारच्या‎ शेतमालासंबंधित धोरणाबाबत मोठ्या‎ प्रमाणात रोष आहे. याच काळात‎ ‘बीआरएस’चे महाराष्ट्रात ताकदीने‎ उतरणे भाजपच्या पथ्यावर पडणारे‎ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात‎ सुरू आाहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये‎ वंचित बहुजन विकास आघाडी आता‎ ‘एमआयएम’सोबत नसल्यामुळे‎ खासदार इम्तियाज जलील यांना‎ फटका बसू शकतो. त्यामुळे त्याची‎ भरपाई वंचितऐवजी ‘बीआरएस’च्या‎ माध्यमातून केली जाऊ शकते.‎ ‎

विदर्भातील मोठे नेते हरिभाऊ राठोड‎ २००४ मध्ये भाजपकडून खासदार‎ निवडून आले होते. २०१३ मध्ये काँग्रेस, ‎ त्यानंतर त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश‎ केला. आता ‘आप’मधून ते ‎ ‘बीआरएस’मध्ये आले आहेत, तर‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ‎ ‎ राहिलेल्या कदीर मौलाना यांनी‎ औरंगाबाद मध्य मतदारसंघात २०१९‎ मध्ये विधानसभेची निवडणूक‎ लढवली होती. ते ७,९२० मते घेत‎ चौथ्या क्रमांकावर राहिले होते.‎ भाजपच्या पथ्यावर पडणार‎ राज्यात सध्या ग्रामीण भागात‎ शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात रोष आहे. ‎त्यामुळे त्याचा महाविकास‎ आघाडीकडे लाभ होऊ शकतो. मात्र ‎ ‘बीआरएस’च्या माध्यमातून ही मते‎ इतरत्र आघाडीपासून दूर जाऊ‎ शकतात. हे मतविभाजन भाजपच्या ‎ ‎ पथ्यावर पडू शकते, असे मानले जाते.‎

चिकटगावकर यांचा‎ दोन पक्षांचा प्रवास‎

अभय चिकटगावकर यांनी‎ वैजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून‎ निवडणूक लढवत २०१९ मध्ये‎ ३९,०२० मते (सुमारे २० टक्के)‎ घेतली होती. त्यांचा शिवसेनेच्या‎ रमेश बोरनारे यांनी ५९,१६३ मतांनी‎ पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी‎ भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी‎ भाजपमधून ‘बीआरएस’मध्ये प्रवेश‎ केला आहे.‎

जाधव तीन पक्षांनंतर

​​​​‘बीआरएस’मध्ये‎ छत्रपती संभाजीनगरमधून ‘बीआरएस’मध्ये गेलेले‎ हर्षवर्धन जाधव हे मनसे, शिवसेना या पक्षांत होते.‎ त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढला होता. .‎ मनसेमध्ये असताना त्यांना कन्नड विधानसभेत २००९‎ मध्ये ४६,१०६ मते मिळाली होती. त्यांनी उदयसिंह‎ राजपूत यांचा पराभव केला. २०१४ मध्ये शिवसेनेकडून‎ लढलेल्या जाधव यांना ६२,५४६ मते मिळाली होती.‎ त्यावेळीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजपूत यांचा‎ पराभव केला. २०१९ मध्ये स्वत:चा राजकीय पक्ष‎ काढून उभे राहिलेल्या जाधव यांनी ६०,५३५ मते‎ घेतली. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.‎

अद्याप निर्णय नाही‎

तेलंगणामध्ये ‘बीआरएस’‎ आणि ‘एमआयएम’ यांची‎ आघाडी आहे. मात्र,‎ महाराष्ट्राबाबत अद्याप‎ कुठलाही निर्णय झालेला‎ नाही. याबाबतचा निर्णय‎ पक्षाचे नेते ओवेसी यांच्या‎ स्तरावर घेतला जाईल.‎ - इम्तियाज जलील,‎ खासदार, एमआयएम‎

महाविकास आघाडीला फटका बसेल‎

ग्रामीण भागात शेतमालामुळे शिंदे-फडणवीस‎ यांच्याविषयी रोष आहे. हा रोष ‘बीआरएस’कडे गेला तर‎ त्याचा फटका मविआला बसेल. त्याचा फायदा भाजपला‎ होईल. - निशिकांत भालेराव, राजकीय अभ्यासक‎

महाराष्ट्रामध्ये कोणाशीही युती नाही‎

‘एमआयएम’सोबत आमची युती नाही. महाराष्ट्रात असा‎ निर्णय झालेला नाही. आमच्यासोबत इतर पक्षातून नेत्यांसह‎ काही चांगले कार्यकर्ते येत आहेत. - माणिक कदम,‎ अध्यक्ष, बीआरएस महाराष्ट्र किसान आघाडी‎