आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरात तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी व्यापारी महासंघाने व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी ता. 12 हिंगोली शहरातील बहुतांश दुकाने सुरू करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार असल्याचे व्यापारी महासंघाचे वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये किराणा दुकान व भाजीपाला विक्री दुकाने वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र व्यापारी प्रतिष्ठानामुळेच कोरोना पसरत आहे का? असा सवाल उपस्थित करून व्यापारी महासंघाने दुकाने बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शासनाकडे केली होती. शासनाने या निर्णयाचा फेरविचार न केल्यास सोमवारपासून राज्यभरात व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार आज सकाळी 11 वाजता व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे, पदाधिकारी सुधीर सराफ, शहराध्यक्ष पंकज अग्रवाल व पदाधिकाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर अकरा वाजता शहरातील बहुतांश दुकाने सुरू करण्यात आली होती. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील. तसेच शासनाच्या नियमानुसार व सामाजिक अंतर पाळून साहित्याची खरेदी-विक्री सुरु ठेवणार असल्याचे व्यापारी महासंघांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान बाजारपेठेतील दुकाने सुरू झाल्यामुळे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली होती. यासंदर्भात व्यापारी महासंघाची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाध्यक्ष गजानन घुगे , शहराध्यक्ष पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, केवळ व्यापारी प्रतिष्ठानातूनच कोरोना पसरतो काय? शासनाने एक तर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत. शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केल्यास त्याला व्यापारी महासंघाचा पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.