आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चौका घाटातील प्रवास वाहनधारकांसाठी अधिक सुकर होणार आहे. येथे नवीन घाटरस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे अंतर ३०० मीटरने कमी होईल. तसेच चढ (ग्रॅडिएंट) देखील कमी होणार आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झालेले हे काम सप्टेंबर २०२२ अखेर संपेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केला आहे. सध्या चौका घाटात सुरुवातीलाच ९० अंशातील वळण आहे. त्यामुळे येथे अवजड वाहनांना घाट चढण्यास वेळ लागतो. समोरून वेगाने येणारी वाहने वळणाच्या ठिकाणी रस्ता सोडून खाली गेल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आता हा घाटरस्ता अधिक सोपा करण्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद ते जळगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गतच या घाटाचे काम सुरू आहे.
सध्या घाटाचा चढ पाच ते ५.५ टक्के एवढा आहे. नवीन रस्ता केल्यानंतर तो तीन ते ५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. घाटाला सध्या ९० अंशातील एक वळण आहे. नव्या रस्त्यात हे वळण ३१ अंशातील असेल. त्यामुळे अपघातही टळतील. घाटात ३० मीटर रुंद जागा संपादित केली आहे. यापैकी १५ मीटर जागेवर चारपदरी काँक्रीटचा रस्ता तयार होईल. रस्त्यालगत साइड ड्रेन असतील, डोंगरातील दगड रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी तटबंदी केली जाणार आहे.
वन्यजीवांसाठी ब्लास्टिंग करणे टाळले ^घाटात वाहतूक सुरू असताना डोंगर कापणे, तेथील दगड हटवणे हे काम आव्हानात्मक होते. येथे वन्यजीवांचा वावर असल्याने ब्लास्टिंग करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे ड्रिलिंग करून खोदकाम करावे लागले. हे काम सुरू असताना एकदाही वाहतूक थांबवली नाही किंवा अन्य मार्गाने वळवली नाही.' - सागर कळम, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सा. बां.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.