आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला पुन्हा अवकाळी तडाखा:वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, मराठवाडा, खान्देश, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात पाऊस

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राला पुन्हा तडाखा दिला. राज्यभरातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पाऊस बरसला. विविध ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली. सिल्लोड तालुक्यात वीज पडून एकाचा तडाख्यात मृत्यू झाला. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात वीज पडून ३ जण, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. या पावसामुळे पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. कोल्हापुरात एक जणाचा मृत्यू झाला.

मराठवाडा : झाडाखाली थांबला, फोनवर बोलताना वीज पडून मृत्यू
उंडणगाव | बहिणीच्या भेटीसाठी जात असताना अंगावर वीज पडून अंबादास भिका राठाेड (२७, रा. वरसाडे तांडा, ता. पाचाेरा, जि. जळगाव) याचा मृत्यू झाला. ही घटना सिरसाळा तांडा (ता. सिल्लाेड) येथे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. सिरसाळा शिवारात मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरू झाला. यामुळे दुचाकी उभी करून अंबादासने लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला होता. मोबाइलवर बोलत असताना अचानक अंगावर वीज काेसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

खान्देश/उत्तर महाराष्ट्र : विजांचा कडकडाट, पिकांचे मोठे नुकसान
जळगाव | जामनेर, एरंडाेल, चाळीसगाव तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे मका, केळी, सूर्यफुलाचे पीक खाली पडले. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, बाऱ्हे, उंबरठाण, बोरगाव, सराड, काठीपाडा, मोहपाडा भागात दुपारी विजेच्या कडकडाटासह १५ ते २० मिनिटे पाऊस झाला.

विदर्भ : वीज कोसळून ३ जण, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू
विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही जिल्ह्यांत गारपीटही झाली. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या विविध घटनांत ३ ठार, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. मृतांत गोपाल करपती (४२), गोपाल महादेव कवळे (३०) यांचा समावेश आहे. जनावरांचाही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे पपई, खरबूज, आंबा, संत्रा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

इशारा : ३ दिवस वादळी पाऊस... ८ ते १० एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस. मराठवाड्यात ८ एप्रिलला हलका पाऊस, तर मुंबईत ढगाळ वातावरण.