आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:चौदा गावांतील 309 शेतकरी महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केली कंपनी, दिली शेतीला उभारी

संतोष देशमुख | छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
 फोटो -  पद्मा चव्हाण, कंपनीच्या अध्यक्षा - Divya Marathi
 फोटो -  पद्मा चव्हाण, कंपनीच्या अध्यक्षा

मराठवाड्यात प्रथमच फुलंब्री तालुक्यातील १४ खेडे गावातील ३०९ महिलांनी एकत्रित येऊन “अंजिता खोरे हुमन्स फार्मर’ कंपनी स्थापन केली. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधी उपलब्ध करून देणे व पिकवलेला शेतमाल खरेदी करून तो विक्री करणे यासह नवनवीन पीक पद्धतीत बदल करून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी महिलांची कंपनी काम करणार आहे. या माध्यमातून मधल्या दलालीला चाप बसेल व नफा थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करून अपार मेहनतीतून शेती पिकवतात. जे शेती करत नाहीत ती बाजारातील साखळी भाव ठरवते. आधारभूत किंमतीची अंमलबजावणी होत नाही. भाव पाडले जातात. यात सुधारणा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या योजनेअंतर्गत महिलांनी एकत्रित येऊन बचत गट स्थापन केले. दुग्ध व्यवसाय, दुग्ध प्रक्रिया उद्योग, कुकुटपालन, शेळी पालन, अन्न प्रक्रिया उद्योग, आदी शेती पुरक व्यवसायाला प्राधान्य दिले. आता स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. दिल्ली येथे कंपनीची नोंदही केली आहे.

या गावांतील जिद्दी महिलांनी घेतला कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार
वारेगाव, किनगाव, शिरोडी, डोंगरगाव, गणोरी, बोधेगाव, नरला, निढोना, मुर्शिदाबाद वाडी, चौका, बाभुळगाव तरटे, वाघोळा, सांजोळ, वानेगाव असे एकुण चौदा खेडे गावातील तीनशे नऊ शेतकरी महिला सभासदांची हि कंपनी स्थापन झाली आहे.

बचतीतून उन्नती, सोबत भांडवलही
दहा रुपये किंमतीचे प्रति सभासदाला १०० शेअर्स विक्री केले. ३ लाख ९ हजार रुपये कंपनीच्या नावे बँकेतही जमा केले आहेत. १० मार्चनंतर पूर्ण क्षमतेत गव्हासह शेतमाल खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रशिक्षण, शेतशिवार भेटी
चांदवड तालुक्यात ओझर खडक गावातील सेंद्रिय फळ शेतीची या महिलांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या शेतीच्या विकासासाठी कंपनीच्या वतीने प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

१० हजार कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट
^महाएफसीसीतर्फे कंपनी स्थापनेसाठी महिलांना मदत झाली. आयटीसी कंपनीचे मार्गदर्शन लाभले. दिल्लीच्या कार्यालयात ३० हजार रुपये शुल्क भरून रितसर कंपनीची नोंद करण्यात आली. केंद्राचे १० हजार कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात या महिला कंपनीचा समावेश आहे.' -पद्मा चव्हाण, कंपनीच्या अध्यक्षा

महिलांच्या हितासाठीच कंपनी कार्यरत
^पंचक्रोशीत लागवड ते विक्री व्यवस्थापनाचे पूर्वनियोजन केले जाईल. प्रोसेसिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ब्रँडिंग करून कंपनीमार्फत विक्रीसोबत गहू, फळ पिकांसाठी आयटीसी कंपनीचा व्हेंडर कोड घेतला. खते, बी बियाणे शेतकऱ्यांना देऊन त्यांचा शेतमाल खरेदी करू. महिलांच्या हितासाठी कंपनी काम करेल.'
- वंदना बंडू जाधव, सचिव

बातम्या आणखी आहेत...