आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे पिक हातचे गेल्याने कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 30 रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील शेतकरी अशोक माणिकराव वडकुते (48) यांना तीन एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या बासंबा शाखेकडून पिककर्ज घेतले आहे. या शिवाय दोन वर्षापुर्वी ट्रॅक्टरही खरेदी केले आहे. त्यासाठीही त्यांनी कर्ज घेतले होते. या शेतात त्यांनी सोयाबीन, तुर आदी पिके घेतली. या शेतातील उत्पन्नावरच त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालतो. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पिक हाती आले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. कर्ज फेडण्याची चिंता असल्याचे त्यांनी कुटुंबियांना बोलून देखील दाखवले होते. मात्र रविवारी ता. 29 रात्री ते घराच्या बाहेर पडले अन त्यांनी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा पवन वडकुते यांनी वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होत नसल्याने मुलाने शेतात जाऊन पाहिले असता वडिल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांनी तातडीने वडिलांना खाली काढून हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक एस. बी. भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार मोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पवन वडकुते यांच्या माहितीवरून बासंबा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 30 रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक एस. बी. भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.