आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वसमत तालुक्यातील थोरावा येथे एका तरुण शेतकऱ्याने बँकेचे कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी शुक्रवारी ता. ११ सायंकाळी उशिरा वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील थोरावा येथे शिवलिंग नवनाथ पत्रे (३६) यांचे थोरावा शिवारामध्ये सुमारे अडीच एकर शेत आहे. या शेतावरच पत्रे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या शेतात पेरणीसाठी त्यांनी ॲक्सिस बँकेच्या वसमत शाखेकडून सुमारे ३५ हजार रुपये व इतर खाजगी फायनान्स कडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या शेतामध्ये त्यांनी या वर्षी सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हाती आलेच नाही. त्यानंतर कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ होते. ता. ९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता शेतात आखाड्यावर जातो असे सांगून ते घरून निघून गेले होते. त्यानंतर दहा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत ते घरी आलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहिले असता शिवलिंग पत्रे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, जमादार बी. एच. चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी ता. ११ सायंकाळी उशीरा चंद्रकांत नवनाथ पत्रे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे. जमादार बी. एच. चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.