आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वसमत तालुक्यातील बोराळा येथे एका तरुण शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिके हातची गेल्याने उदरनिर्वाह कसा करावा तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ९ सकाळी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तीन दिवसांत तीन तरुणांनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराळा येथील राजू बाबुराव गंगातीरे (२४) यांना दोन एकर शेत आहे. या शेतातील पिकांवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. घरी आई,, वडील व स्वतः राजू असे तीन जणांचे कुटुंब आहे. या शेतावर त्यांनी पेरणीसाठी कर्ज देखील काढले होते. त्यातून शेतात सोयीबनची पेरणी केली होती. मात्र यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यातच आता परतीच्या पावसानेही शेतातील हाती अालेले सोयीबीनचे पिक काढता येत नसल्याने या पिकांना कोंबे फुटली. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. आता रब्बी हंगामात पेरणी कशी करावी तसेच उदरनिर्वाह कसा करावा अन बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.
दरम्यान, रविवारी ता. ११ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी बोराळा गावालगत मुख्य रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार भुजंग कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी आज प्रकाश गंगातीरे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांत तीन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने बोराळा गावच हादरून गेले आहे. गावातील प्रभाकर प्रल्हाद जाधव (३२) या तरुणाने सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्जकसे फेडावे या चिंतेतून शुक्रवारी ता. ९ सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर संतोष बाजीराव खराटे (२२) या तरुणाने शनिवारी ता. १० राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शेतीच्या वादातून धमक्या दिल्या जात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, तीन दिवसांत तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने बोराळा गावा सोबतच वसमत तालुका हादरला आहे. २५०० लोकसंख्येच्या या गावात तरुणांच्या झालेल्या आत्महत्या गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरल्या आहेत.
समुपदेशनासाठी प्रकल्प प्रेरणा कार्यालयास सुचना दिल्या : रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली
गावातील या घटने संदर्भात तातडीने भेट देऊन माहिती सादर करण्याच्या सुचना वसमत तहसीलदारांना दिल्या आहेत. तसेच शासकिय रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणांतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना गावात जाऊन शेतकरी व गावकऱ्यांचे समुपदेशन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.