आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ग्रामपंचायतीत पदभार घेण्यासाठी दोन ग्रामसेवकांमध्ये चढाओढ लागली आहे. एक ग्रामसेवक पदभार घेण्यासाठी ठाण मांडून बसला आहे तर दुसरा पदभार सोडायला तयार नाही. त्यामुळे गावातील विकासाला खीळ बसली आहे. काक्रंबा (८ ते १० हजार लोकसंख्या) गावची पंचवार्षिक निवडणूक दोन महिन्यांपूर्वीच झाली.
मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. परंतु निवडणुकीत तरुण निवडून आले आहेत. काक्रंबा ही मोठी व तुळजापूरपासून हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायत असल्याने शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. त्यामुळे पदभार घेण्यासाठी दोन ग्रामसेवकात स्पर्धा लागली आहे. पूर्वीचे ग्रामसेवक जिलानी तांबोळी हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे नूतन सरपंच व काही सदस्यांनी पंचायत समितीकडे नवीन ग्रामसेवक देण्याची मागणी केली. परंतु तांबोळी यांची रजा संपण्यापूर्वीच बीडिओंनी ग्रामसेवक म्हणून केवळराम यांची नियुक्ती केली. केवळराम जॉइन होऊन एक महिना होत आला. त्यांनी मासिक सभा, ग्रामसभा घेऊन कामकाजही सुरू केले. परंतु पूर्वीचे तांबोळी ग्रामसेवक येथेच काम करण्यास उत्सुक आहेत.
त्यामुळे त्यांनी पदभार सोडला नाही. नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक केवळराम हे काक्रंब्यासाठीच उत्सुक असल्याने ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे मागील एका महिन्यापासून दोन ग्रामसेवकांमध्ये काक्रंबा ग्रामपंचायतीचा पदभार घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. यामुळे नागरिकांच्या कामांसह गावातील विकासकामे खोळंबली आहेत. सरपंच कालिदास खताळ हे सुद्धा पंचायत समितीचे उंबरठे झिजवून वैतागले आहेत. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
पाच वर्षात ८ ग्रामसेवक, यावेळी किती?
काक्रंबा येथील अंतर्गत राजकारण, विरोधकांचा सातत्याने विरोध आदींमुळे येथील ग्रामपंचायतीचा पदभार घेऊन काम करण्यास कोणताही ग्रामसेवक तयार नव्हता. वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे गत पाच वर्षात काक्रंब्याला तब्बल ८ ग्रामसेवक लाभले. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच कोणता ग्रामसेवक घ्यायचा, यावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे या पंचवार्षिकमध्ये किती ग्रामसेवक लाभणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.