आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरंडा-बार्शी मार्गावर पिंपळवाडी येथे भरधाव वाहनाने आठ वर्षीय शाळकरी मुलीस चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (दि.२५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून आरोपीस तत्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी सांगितले की, भाग्यश्री पवार परंडा ते बार्शी मार्गावर वारदवाडी फाट्याजवळ आई-वडिलांसह राहत होती. वारदवाडी येथून पिंपळवाडी येथे सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद शाळेकडे येत असताना परंड्याहून बार्शीकडे जाणाऱ्या भरधाव फाॅर्च्यूनर गाडीने (एमएच १२ जे ९६९६) भाग्यश्रीला चिरडले. गाडी चालक नाना भगवान पवार (रा. करंजा, ता. परंडा) याने निष्काळजीपणे गाडी चालविल्याने ही घटना घडल्याचे भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी सांगितले. घटना घडताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीस पाहुन व घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. अपघात होताच भितीने वाहनचालक नाना पवार वाहनासह फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी सांगितले. दुपारी चार वाजता मृत भाग्यश्री पवार या मुलीच्या नातेवाईकांनी परंडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देवून आरोपी वाहनचालकास अटक करण्याची मागणी करीत भाग्यश्रीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.संबंधित आरोपीला लवकरच अटक करू, असे पोलीसांनी सांगितले. त्यानंतर तणाव निवळला. भाग्यश्रीच्या मृत्यूमुळे पिंपळवाडी गावात शोककळा पसरली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.