आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन महिन्यांपासून मजुरी थकल्याने मजुरांच्या कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी अडचण येत आहे. तसेच कचरा वाहून नेणाऱ्या गाडीचे पेमेंट होत नसल्याने गाड्यांचे हप्ते थकले आहेत. पालिकेने मजुरांची थकीत मजुरी देऊन गाड्यांचे पेमेंट करावे, या मागणीसाठी स्वच्छता कामगारांनी गुरुवारी (दि.३) धाराशिव नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पालिका व ठेकेदाराने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
धाराशिव शहराची पहाटेपासून स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेकडे जवळपास ३०० पेक्षा अधिक मजूर आहेत. त्या मजुरांमार्फत शहरातील रस्त्यांची सफाई केली जात असून गल्लीतील कचरा गोळा केला जातो. या मजुरांमध्ये अनेक कुटुंबातील पती-पत्नी व मुलेही कामाला आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार मागील दोन महिन्यांपासून थकीत आहे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डातून कचरा गोळा करण्यासाठी १५ पेक्षा अधिक खासगी वाहने आहेत. त्यांचेही पेमेंट वेळेवर होत नाही. यामुळे वाहनधारकांचे हप्ते थकले असून बँकांकडून तगादा लावला जात आहे.
यामुळे गुरुवारी मजूर व वाहनधारकांनी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेला कामगारांची मजुरी देणे होत नसेल तर आमचे पैसे देऊन बंद करावे. काम करून घेतले जाते मात्र वेळेवर मजुरी दिली जात नसल्याने कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत होता. काही मजुरांच्या औषध-गोळ्यांसाठी पैसे नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. घरात अन्न खायला नसल्याने मजुरांनी ठिय्या आंदोलन केले. अनेक मजुरांना व्याजाने पैसे घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असल्याचे सांगितले. दरम्यान, ठेकेदार व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मजुरीबाबत आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी आंदोलन मागे घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.