आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिलेगाव (ता. तुळजापूर) येथे धनगर समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न तापला असून वारंवार मागणी करूनही प्रशासनाने स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला नसल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका मृतावर अंत्यसंस्कार केले. निलेगाव येथे धनगर समाजाच्या मूळ स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असूनही प्रशासनाने तोडगा काढला नाही. स्मशानभूमीसाठी दिलेली जागा धनगर समाजास मान्य नाही. १०० वर्षांपासून ज्याठिकाणी धनगर समाजाची स्मशानभूमी आहे, तीच जागा प्रशासनाने द्यावी, अशी मागणी धनगर समाजाची आहे. मात्र, प्रश्न सोडवला नाही. शुक्रवारी मालू निंगा दुधभाते (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला.
संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच चिता रचून दुधभाते यांच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबतची माहिती मिळताच तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील व नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधीर मोटे, नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, ईटकळचे मंडळ अधिकारी नेमचंद शिंदे, तलाठी अंजुषा नामदेव व इतर अधिकारी व कर्मचारी निलेगावत दाखल झाले. पाहणी केली. सध्या निलेगाव मध्ये शांततापूर्ण वातावरण आहे. प्रशासनाने आता तरी दखल घेऊन धनगर समाजाच्या स्मशानभुमीचा प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.