आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अनुदान रखडल्याने सात शेतकऱ्यांनी‎ घेतले गाडून, दोघांना उष्णतेने भोवळ‎

धाराशिव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिकविमा मिळेना, अतिवृष्टीचे‎ अनुदानही रखडले यामुळे सोनेगाव (ता.‎ धाराशिव) येथे जनहित शेतकरी‎ संघटनेच्या कार्यकर्त्यांसह सात‎ शेतकऱ्यांनी जमिनीत गाडून घेण्याचे‎ आंदोलन केले. प्रचंड उन्हामुळे दोन‎ शेतकऱ्यांना भोवळ आली. यावेळी‎ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तीच तीच‎ उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न‎ केला. सध्या विधीमंडळ अधिवेशन सुरू‎ असल्यामुळे प्रकरण न वाढण्याची दक्षता‎ प्रशासनाकडून घेण्यात आली.‎ शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर‎ महसुल व पोलिस यंत्रणेनेने सुटकेचा‎ श्वास सोडला.

‎ दिवाळीच्या दरम्यान १६०० कोटी रुपये‎ शेतकऱ्यांना देण्याची वल्गना करणाऱ्या‎ राज्य शासनाने अद्याप अतिवृष्टी २२२‎ कोटी अनुदान वितरीत केलेले नाही.‎ तसेच पिकविमा कंपनीवरीलही‎ सरकारचे नियंत्रण सुटल्यासारखी स्थिती‎ असून अनेकांना अद्याप हक्काचा‎ विमाही मिळालेला नाही. यामुळे जनहित‎ शेतकरी संघटनेने तातडीने शेतकऱ्यांना‎ न्याय न मिळाल्यास जमिनीत गाडून‎ घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला‎ होता.

प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास‎
विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. आंदोलनाचे‎ पडसाद विधीमंडळापर्यंत जाऊ नयेत म्हणून‎ प्रयत्न करण्यात येत होते. क्षणक्षणाला माहिती‎ वरिष्ठस्तरावर दिली जात होती. यावेळी पोलिस‎ अधिकाऱ्यांनी काही प्रतिष्ठीतांना मध्यस्थी‎ बनवून शेतकऱ्यांचे मन वळण्याची खेळी‎ केली. यात यश आल्याने अधिकाऱ्यांनी‎ सुटकेचा श्वास सोडला.‎

शिंदेंच्या काळात ८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या‎
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या‎ पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,‎ विमा व अनुदान रखडले, हातचे पिक वाया गेले, शेतकऱ्यांच्या‎ पदरात काहीच नसल्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून‎ जिल्ह्यातील ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अद्यापही‎ आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तरीही शासनाकडून‎ शेतकऱ्यांना रक्कम देण्यासाठी विलंब केला जात आहे. विमा‎ कंपन्यांवरही म्हणावा तसा दबाव टाकला जात नाही.‎

अधिकाऱ्यांकडून तीच तीच उत्तरे‎
वास्तविक पहाता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन‎ वर्षांपासून कंपनीच्या हेकेखोरपणामुळे विमा मिळालेला‎ नाही. तसेच यावर्षी प्रचंड अतिवृष्टी होऊन अनुदानही‎ देण्यात आलेले नाही. दिवाळीपासून शेतकरी अनुदानाची‎ प्रतीक्षा करत आहे. यावेळीही नेहमीची टीपिकल उत्तरे देऊन‎ अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सरकार‎ प्रयत्नशिल आहे, प्रशासन पाठपुरावा करत आहे,‎ पत्रव्यवहार सुरू आहे, अशीच उत्तरे शेतकऱ्यांना मिळाली.‎

मागणी पूर्ण न केल्यास तीव्र अांदोलन‎
सध्या आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. आणखी १०‎ दिवस प्रतीक्षा करण्यात येईल. हक्काची रक्कम न‎ मिळाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार आहे.‎ त्यावेळी मात्र, माघार घेतली जाणार नाही.‎- अमोल जाधव, जिल्हाध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना.‎

रक्कम मिळाल्यावर लगेच वितरीत‎
शासनाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.‎ अनुदानाची रक्कम तालुकास्तरावर प्राप्त होताच ती लगेच‎ वितरीत करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. विमा‎ कंपनीलाही याेग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.‎- गणेश माळी, तहसीलदार.‎

बातम्या आणखी आहेत...