आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू, आरोग्य केंद्रातील चौघांची बदली‎; जीपच्या प्रकाशात झाले शवविच्छेदन‎

कळंब25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरमाळा‎ कळंब तालुक्यातील दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य ‎ ‎केंद्रात डाॅक्टरच्या हलगर्जीमुळे एका शेतकऱ्याला जीव ‎गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ‎ठोकून संबंधितांवर कारवाई होणार नाही, तोपर्यत मृतदेह ‎ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.

यामुळे येथील दोन ‎वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांची बदली करुन‎ ग्रामस्थांची बोळवण करण्यात आली. ग्रामस्थ‎ संबंधितांवर निलंबनाची मागणी करत आहेत.‎ दहिफळ येथील सुभाष भातलवंडे यांनी आजारपणास ‎ ‎ कंटाळून दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन ‎आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी मुलगा प्रविण‎ तेथे आला. त्याने वडील सुभाष यांचा फास सोडवला.‎ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथील वैद्यकीय ‎अधिकारी डॉ. गोरखनाथ मुंढे यांनी ‘आज सुटी आहे’,‎ असे म्हणत उपचार करण्याऐवजी टाळाटाळ केली.‎ ‎ ‎ ‎

उपचार तथा तपासणीसाठी यंत्र नाही, असे म्हणत‎ रुग्णाला हातही लावला नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने सुभाष यांचा मृत्यू झाला. हे‎ ग्रामस्थांना समजल्यावर संतप्त जमाव केंद्रात आला.‎ ग्रामस्थांनी याप्रकरणी डॉ. मुंढे व अन्य कर्मचाऱ्यांवर‎ कारवाई करणार नाही तोपर्यंत मृतदेहही ताब्यात घेणार‎ नसल्याचे म्हटले. यामुळे पोलिस व तालुका आरोग्य‎ अधिकारी जे. एन. सय्यद तेथे आले. त्यांनी ग्रामस्थांचा‎ आक्रमकपणा पाहून दोन वैद्यकीय अधिकारी, लिपिक,‎ आरोग्य सहायकाची बदली करणार असल्याचे‎ सांगितले. सध्या सुटी असल्याने ही कारवाई सोमवारी‎ होणार आहे.

यामुळे ग्रामस्थांनी शवविच्छेदनासाठी‎ कुलूप काढण्यास परवानगी दिली.‎ आरोग्य केंद्राची प्रतिमा मलिन‎ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद यांनी वैद्यकीय‎ अधिकारी डॉ. गोरखनाथ मुंडे व डॉ. किसन लोमटे यांची‎ ग्रामस्थांशी सतत वाद होत असल्याच्या कारणावरून तर‎ कनिष्ठ सहायक एस. ए. सुतार, आरोग्य कर्मचारी आर.‎ ए. घोणसे यांना यंत्रणा अद्ययावत न ठेवल्यामुळे आरोग्य‎ केंद्राची प्रतीमा मलिन केल्याचा ठपका ठेवून बदली‎ केली. त्याचा रितसर अहवाल वरिष्ठांना देण्यात आला‎ आहे.‎

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली. यात‎ शेतकऱ्याचा जीव गेला. चांगला स्टाफ मिळेपर्यंत‎ आमचा लढा सुरू राहील. संबंधित वैद्यकीय‎ अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.‎ -चरणेश्वर पाटील, सरपंच.‎

पोलिस जीपच्या प्रकाशात करावे‎ लागले मृताचे शवविच्छेदन‎

शवविच्छेदन करताना अचानक विद्युत पुरवठा बंद‎ पडला. त्यावेळी शासनाने दिलेले जनरेटर,‎ ग्रामपंचायतीने पुरवलेले साहित्यच उपलब्ध नसल्याचे‎ दिसून आले. यामुळे अंधार निर्माण झाला. यामुळे पुन्हा‎ ग्रामस्थ संतप्त झाले. तेव्हा येरमाळ्याचे पोलिस‎ उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलिस कर्मचारी आनंद‎ वाटोरे, बीट अंमलदार प्रकाश चाफेकर यांनी ग्रामस्थांची‎ समजूत काढली. नंतर चक्क मोबाइलच्या प्रकाशात‎ नंतर जीपचे हेडलाइट्स लावून शवविच्छेदन करण्याची‎ वेळ आली.‎