आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवितव्य कळ्यांचे:बालविवाह लावणाऱ्या पालकांविरुद्ध प्रथम पंचनामे करून गुन्हे दाखल करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्ह्यात बालविवाह आणि गर्भलिंग निदानाच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी कडक पावित्रा घ्या. ज्या गावात बालविवाह होतील तेथे जाऊन त्या पालकांविरुद्ध पंचनामे करून पोलिसात गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कोविड-१९ मध्ये विधवा आणि अनाथ झलेल्या एकल महिलांच्या पुनर्वसन आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.एस यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. अंकुश, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बी.एच. निपाणीकर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रमुख बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही पालक गमावलेल्या १४ बालकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख व पी.एम केअर अंतर्गत १० लाखांची मुदतठेव दिल्याचे श्री. अंकुश यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ते म्हणाले, आईचा मृत्यू झालेल्या ३२ आणि वडिलांचा मृत्यू झालेल्या १९८ आणि दोन्ही बालक गमावलेल्या १४ असे एकूण २४४ बालकांना प्रतिमाह ११ हजार रुपये बालसंगोपनाचा लाभ मंजूर केला आहे. पालकांच्या नावे असलेले बॅंकांच्या कर्ज प्रकरणांबाबत चर्चा केली. दिवेगावकर यांनी बॅंक अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.बाल न्याय निधीबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.

कोविडमध्ये एक किंवा दोन्ही पालक गमावलेले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दहा हजारपर्यंत मदत करता येते. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाच हजार, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सात हजार आणि नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांना दहा हजारांची मदत तत्काळ करावी. बालन्याय निधीअंतर्गत ३५ लाखांचा निधी मिळाला आहे. या अर्थसहाय्यासाठी एकूण १३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. संबंधितांना अर्थसहाय्य प्रदान करण्यात येईल असे श्री. अंकुश यांनी सांगितले.

30 जुलैपर्यंत मिशन वात्सल्यची कामे करून घेण्याच्या सूचना
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोविडमुळे निराधार झालेल्या एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य आणि जिल्हा परिषद या दोन्ही महिला व बालविकास विभागांना संयुक्तपणे काम करण्याच्या सूचना केल्या. मिशन वात्सल्य समितीमार्फत एकल महिलांसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले की ३० जुलैपर्यंत मिशन वात्सल्यची सर्व कामे करून घ्या. कोविडमुळे जिल्ह्यात १२५२ महिला एकल झाले आहेत. त्यांना घरकुल योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विभागाच्या आणि कृषी विभाच्या योजना अशा सर्व योजनांचा शंभर टक्के लाभ देण्यासाठी प्रत्येक आधिका-याने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक एकल महिलेला योजनांबद्दल माहिती सांगावी.यासाठी ग्रामीण भागात आशा वर्कर्स आणि शहरी भागांमध्ये आंगणवाडी सेविकांची मदत घ्या, असे ते म्हणाले.