आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याचे दिसून येत आहे. हजेरी नोंदवहीवर सही करून कर्मचारी निघून जाऊ नये, यासाठी शासनाने सकाळी व सायंकाळी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. मात्र, भूम तालुक्यातील एकाही शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावत आहे.
कोरोना काळात संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कर्मचारी व अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. त्याऐवजी संबंधित विभागातील वहीमध्ये स्वाक्षरी करुन उपस्थिती लावली जात होती. परंतु आता कोरोनाची साथ ओसरल्यावर र बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
परंतु शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वाक्षरी करुन नोंदीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पाच दिवसांच्या आठवड्याचा निर्णय घेतल्याने अधिकारी व कर्मचारी खुश आहेत. मात्र, नागरिक या निर्णयावर समाधानी नाहीत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन कार्यालयीन वेळा देण्यात आल्या आहेत. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयाचे कामकाज करण्याचे आदेश आहेत.
मात्र, कर्मचारी वेळेत येतात की नाही, हे पाहण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा नसल्याने अधिकारी व कर्मचारी केव्हा येतात व कधी जातात, हे समजतच नाही. बऱ्याच वेळा अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर नसतात. केवळ नोंदवहीत हजेरी लावून निघून जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही कर्मचारी तर दोन दिवसानंतर येऊन नोंदवहीत सही करतात, असेही समजते.
यावर नियंत्रणासाठी कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक यंत्रणा बसवणे अत्यावश्यक आहे. या यंत्रणेवर कोणता कर्मचारी किती वाजता आला व गेला याची ऑनलाइन नोंद होते. त्यानुसारच त्यांचा पगार काढल्यास शासनाचे देखील आर्थिक नुकसान टळणार आहे. नुसती बायोमेट्रीकवर हजेरी लाऊन उपयोग नाही तर बायोमेट्रिक वरील नोंदीनुसारच पगार निघण्याची व्यवस्था शासनाने राबवावी. शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाला बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याच्या आदेश देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
‘त्या’ हजेरीवरुनच पगार काढा
नागरिकांची कामे होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रिक हजेरीवरुनच काढला जावा. बाळासाहेब क्षीरसागर, भाजप नेते, भूम.
यंत्रणा कार्यान्वयनाची सूचना देणार
शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे. ज्या कार्यालयांनी यंत्रणा बसवली नाही किंवा यंत्रणेत बिघाड झाला आहे, त्यांनी तत्काळ यंत्रणा बसवावी कार्यान्वित करुन घ्यावी, याबाबत सूचना देणार आहे. - रोहिणी नऱ्हे, उपविभागीय अधिकारी, भूम.
... तर कर्मचाऱ्यांनाही लागणार शिस्त, कामांना येणार वेग
शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेत जात आहे. बायोमेट्रिक हजेरी लावा अन्यथा पगार बंद करा, अशा आदेश शासनाने काढला पाहिजे. बायोमेट्रीकमुळे लेट लतीफ कर्मचाऱ्यांना शीस्त लागेल. प्रभाकर गाढवे, नागरिक, भूम.
कर्मचारी वेळेत आली तर नागरिकांची कामे झपाट्याने होतील
भूम तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, वनपरिक्षेत्र कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षण अधिकारी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह अनेक इतरही कार्यालयांमध्ये नवीन कार्यालयीन वेळेनुसार क्वचितच एखादा अधिकारी निर्धारीत वेळेत हजार झालेला पहायला मिळत आहे. अधिकारी वेळेत हजर झाले तर इतरही कर्मचारी वेळेत कार्यालयात येतील. नागरिकांची कामेही झपाट्याने होतील. यासाठी बायोमेट्रीक बसवणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.