आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:राघुचीवाडी शाळेच्या प्रत्येक वर्गात ग्रंथालय, भाषिक कौशल्यात विद्यार्थी अग्रेसर‎

उपेंद्र कटके | धाराशिव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ग्रंथालयाची‎ वानवा असताना धाराशिव तालुक्यातील‎ राघुचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत‎ प्रत्येक वर्गात ग्रंथालय सुरू करण्यात आले.‎ उपक्रमशील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे हे साध्य झाले‎ असून आता यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य‎ वृद्धिंगत होत आहे. तसेच त्यांना विविध स्तरावरील‎ अध्ययन निष्पत्तीही साध्य करता येत आहे.‎ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन‎ झालेल्या धाराशिव जिल्ह्यात सध्या शाळेतच काय‎ प्रत्येक गावातही ग्रंथालय सापडत नाही. यामुळे‎ अनेक पिढ्या आता वाचनापासून दूर जात आहेत.‎ मात्र, आजही वाचन चळवळ टिकवून‎ ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्नरत आहेत. असाच‎ एक यशस्वी प्रयत्न राघुचीवाडी शाळेतील शिक्षक‎ समाधान शिकेतोड यांनी केला आहे.

येथील‎ शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग सुरू आहेत.‎ सुरुवातीला शाळेचे एकच ग्रंथालय होते. मात्र,‎ विद्यार्थ्यांकडून याचा उपयाेग होत नव्हता. यामुळे‎ शिकेतोड यांनी प्रत्येक वर्गात ग्रंथालय सुरू‎ करण्यासाठी पुढाकार घेतला. आता समोरच‎ पुस्तके असल्यामुळे विद्यार्थ्यांची नजर आपणहून‎ पुस्तकांकडे वळत असून विद्यार्थी वाचण्याचा‎ प्रयत्न करत आहे.‎ अन्य शिक्षकांचेही सहकार्य‎ शिकेतोड यांच्या प्रयत्नाला मुख्याध्यापक‎ महादेव थोरात यांनी भक्कम साथ दिली. प्रमोद‎ शिंदे, प्रेमनाथ जाधव, योगेश कपाळे, नामदेव हुंबे,‎ कविता पांगळ आदींचेही सहकार्य असल्याने हा‎ प्रकल्प यशस्वी ठरत आहे. अन्य शाळांनीही‎ विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता वाढवण्यासाठी असा‎ उपक्रम राबवण्याची गरज आहे.‎

अशी आहे वर्ग वाचनालयांची रचना‎
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचे‎ अवलोकन करून त्यांना पुस्तके उपलब्ध केली.‎ पहिली, दुसरीच्या वर्गांसाठी चित्रयुक्त पुस्तके‎ आहेत. नंतर पाचवीपर्यंत गोष्टीरुप पुस्तके दिली‎ आहेत. याशिवाय त्यावरील वर्गांसाठी काही‎ सामान्य ज्ञान, इतिहास, महापुरूषांची माहिती‎ सांगणारी पुस्तके आहेत. प्रत्येक वर्गात ८० ते ९०‎ पुस्तकांचा संच असून प्रत्येक पुस्तक वाचावे,‎ यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.‎

भाषिक कौशल्य वाढले
ग्रंथालयात नवीन पुस्तके‎ वाचण्यास मिळत असल्यामुळे‎ विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्ये‎ वाढत असल्याचे शिक्षकांचे‎ निरीक्षण आहे. तसेच नवीन‎ शब्द, वाक्यरचना वाचण्यात‎ आल्याने विद्यार्थ्यांचा‎ अध्ययनस्तर विकसित होत‎ असल्याचेही दिसून येत आहे.‎ शालेय व्यवस्थापन समिती‎ अध्यक्ष दर्लिंग बेलदार, सदस्य‎ शंकर मोरे आदी पालकांकडूनही‎ या ग्रंथालयांचे कौतुक होत आहे.‎

विद्यार्थीच बनले ग्रंथपाल
प्रत्येक वर्गातील ग्रंथालयाच्या नियोजनासाठी‎ विद्यार्थ्यांनाच ग्रंथपाल बनवण्यात आले. शिकेतोड‎ यांनी प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील रजिस्टर‎ हाताळणे, पुस्तके नेल्याची व परत केल्याची नोंद‎ करणे, विद्यार्थ्यांने पुस्तक न दिल्यास पाठपुरावा‎ करणे, पुस्तक न घेणाऱ्या विद्यार्थ्याला आग्रह करणे‎ आदी बाबी या ग्रंथपालांना शिकवल्या आहेत. यामुळे‎ प्रत्येक वर्गातील ग्रंथालयाचे काम विद्यार्थीच‎ यशस्वीपणे संभाळतात.‎

अभिव्यक्ती‎‎ क्षमतेचाही‎ विकास‎
‎ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती विकसित‎ होण्यास मदत होत आहे. भाषिक कौशल्य विकसित होत आहेत.‎ शाळेतील विद्यार्थी उत्तम पुस्तक परिचय लेखन करत आहेत.‎ त्यांच्यातील अभिव्यक्ती क्षमता विकसित होत आहे.''‎ -समाधान शिकेतोड, ग्रंथालय विभाग प्रमुख.‎

बातम्या आणखी आहेत...