आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा यंदाच्या वर्षातील खरीप हंगाम सततचा पाऊस, अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट झाली. उत्पन्न जेमतेमच निघाल्याने शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीच्या पेरणीला सुरुवात केली. वातावरण बदल व धुक्यामुळे रब्बी हंगाम ही संकटात सापडला असून एकीकडे कीड रोगाचा प्रादुर्भाव व दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या नासाडीने शेतकरी संकटात आलेला आहे. तालुक्यात खरीप हंगाम अतिवृष्टी आणि परतीचे पावसात गेल्यानंतर रब्बी हंगामात मुबलक उत्पन्न निघण्याची आशा लागली असताना जवळपास शंभर टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या, मात्र वातावरणातील बदल, धुक्याने किड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात आलेला. सध्या हरभरा व ज्वारीचे पिक सुकून जात असल्याने पिके माना टाकायला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी पिके जगविण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करत पिक जगवण्याची धडपड सुरू केली आहे.
यंदाच्या वर्षात पावसाने शेवटचे टप्प्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला, तुरीच्या मोसमात बुरशीजन्य रोगाने फक्त काळवंडल्याने मुबलक उत्पन्नाची आशा वातावरण बदलाने मावळली. वातावरण बदलाचा फटका रब्बीच्या हंगामातील पिकांना ही बसत आहे. सध्या ज्वारी व हरभरा पिक बहरात असताना पदरमोड करीत शेतकऱ्यांनी महागडे औषधीची खरेदी करत फवारणी केली आहे. अतिवृष्टीमुळे पेरण्याला विलंब होत असल्याने निसर्गाच्या भरवस्यावर शेतकऱ्यांनी निर्धारित क्षेत्रापेक्षा सर्वाधिक क्षेत्रात रब्बीची पेरणी केली. दिवसभर ढगाळ व पहाटेच्या सुमारास होणाऱ्या धुक्यामुळे हरभरा पिकांवरील घाटे व हिरव्या अळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी पदरमोड करीत औषध फवारणी करून पिके जगविण्याची धडपड सुरू असताना वन्यप्राणी यांच्या नासाडीने शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे.
वन्यप्राण्यांमुळे ज्वारी, हरभरा पिके हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागली असताना हरीण, वानर व रानडुक्कर या वन्यप्राण्या कडून हरभरा, ज्वारी पिकांची नासाडी होत आहे. ज्वारी बहरात व हरभरा फूल-फळधारणेत असताना पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असून निसर्गाच्या भरवशावर महागडे बियाणे, खते खरेदी करून पेरणी केली. दरम्यान तालुक्यात शेतकरी पिकांना जिवनदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
१२० टक्के क्षेत्रात हरभरा
तालुक्यात यंदा रब्बी पेरणीचे ४४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून जवळपास शंभर टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे. पीकनिहाय क्षेत्र व कंसात पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे ज्वारी एकूण १६ हजार सातशे हेक्टर (९५००), गहू एकूण पेरणी क्षेत्र दोन हजार ४७५ हेक्टर (२६३५), हरभरा एकूण २० हजार ८४५ हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रात म्हणजे १२० टक्के पेरणी झाली आहे. करडई एकूण पेरणीचे क्षेत्र तीन हजार १४ हेक्टर (२९५२), जवस ४१४ हेक्टर क्षेत्र तर सूर्यफूल एक हजार ४७० हेक्टर तर बाराशे हेक्टर क्षेत्रात इतर पिकांचा पेरा झाला आहे.
वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी !,वनविभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी
यंदा वेळेवर पाऊस झाल्याने तालुक्यात बहुतांश क्षेत्रावरती पेरण्या झाल्या असून शेतशिवारात पिके जोमात आलेली असलीतरी मुळज, एकुरगा, कोरेगांव, येणेगुर, माडज आदी परिसरात वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने हरणासह वानरांचे कळप चाऱ्याच्या शोधात शिवारात भटकत असून कोवळ्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. निसर्गाच्या दुष्ट चक्रात अडकलेला शेतकरी वन्यप्राण्यांच्या कडून होत असलेल्या पिकांच्या नासाडीमुळे हतबल झाला आहे. याबाबत मुळजचे शेतकरी नागेश बिराजदार म्हणाले, खरिप हंगाम पावसाने वाया गेला, रब्बीचे बऱ्यापैकी उत्पन्न निघेल या आशेने पेरणी केली. रब्बी पिके चागली बहरात आली आहेत. मात्र शेतात वन्यप्राण्याचा हैदोस सूरु असल्याने नवीन संकट उभे राहिले आहे. शेतात वन्यप्राणी पळविण्यासाठी विविध प्रयोग करीत असूनही ते निष्फळ ठरत आहे. यावर्षी रब्बी हंगामातील खर्च निघणार की नाही याची शाश्वती वाटत नाही. तरी वन्य प्राण्यापासून पिकांचा बचाव करण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री थंडीत शेती जागल करत पिकांची राखण करावी लागते आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा पिकांना फटका बसत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.