आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळा तोंडावर आला असून काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. परंतु सोयाबीन बियाणे व खतांची पेरणीपूर्वीच टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची घरगुती बियाण्यांवरच मदार असणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहे. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती पेरणीयोग्य पावसाची. हवामान खात्याने यावर्षी मान्सून वेळेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, खरिपाची पेरणी करताना ऐनवेळी धांदल नको म्हणून शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडे जाऊन बियाणे व खतांच्या खरेदीसाठी विचारपूस सुरू केली आहे. परंतु शेतकऱ्यांना पाहिजे असलेली खते दुकानात उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांची डीएपी व १२.३२.१६ या खतांना सर्वाधिक मागणी आहे. परंतु हे खत जिल्ह्यात उपलब्धच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांना हे खत मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. उपलब्ध होणारे बियाणे व पेरणी क्षेत्राचा विचार करता शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांचीच पेरणी करावी लागणार आहे. जे खत उपलब्ध आहे ते स्विकारण्यावाचून शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. त्यामुळे धाकधुक लागली आहे. जिल्हा प्रशासनाने खरीपपूर्व आढावा बैठक घेतली, परंतु तो फार्सच ठरला. प्रशासनाचा वेळकाढूपणा हा शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत बिघडवणारा ठरणार असल्याचे चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.