आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यासह परभणी व रिसोड येथून चोरलेल्या 14 दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या असून या प्रकरणात हिंगोली शहरातील तिघांना मंगळवारी ता. 15 पोलिसांनी अटक केली आहे. शेख शोएब, शेख अश्पाक, साजिद पठाण ( रा. पेन्शनपुरा हिंगोली ) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांची कुलूप तोडून वाहने चोरली जाऊ लागली होती.
दरम्यान, दुचाकी चोरांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. यामध्ये उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, आकाश टापरे यांचा समावेश होता. या पथकाने मागील तीन दिवसांपासून शहरात दुचाकी चोरांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर या पथकाने शहरातील पेन्शनपुरा भागातील शेख शोएब, शेख अश्पाक, साजीद पठाण या तिघांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची माहिती दिली यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील बारा दुचाकी व परभणी व रिसोड येथील प्रत्येकी एक दुचाकी वाहन अशा चौदा दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.