आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारात एका शेतातील भाजीपाल्याच्या पिकांतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी एक वाजता गांजाची ५० झाडे जप्त केली आहेत. या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील एका शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, किशोर सावंत, शंकर जाधव, आकाश टापरे, शंकर ठोंबरे, शेख जावेद यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच वसई शिवार पिंजून काढले. त्यानंतर एका शेतात भाजीपाल्याच्या पिकांमध्ये गांजाची झाडे असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी गांजाची झाडे मोजली असता लहान-मोठी सुमारे ५० झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे उपटून त्याचे वजन करण्यास सुरुवात केली असून या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, झाडांचे वजन केल्यानंतरच किंमत स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका शेतकऱ्याचीही चौकशी सुरू केली असून या परिसरात आणखी काही शेतात गांजाची लागवड केली आहे काय, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.