आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यामध्ये अन्नातून विषबाधा झालेले तब्बल 91 रुग्ण सोमवारी ता. 6 उपचारासाठी दाखल झाले आहे. रात्री नऊ वाजे पर्यंत रुग्ण येणे सुरुच होते. यामध्ये 7 लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर वैद्यकिय पथकाने तातडीने उपचार सुरु केले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील मदिना नगर नुरी मोहल्ला भागातील नागरीक आज सकाळी यवतमाळ जिल्हयातील इसापूर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजता विवाह सोहळा आटोपल्यानंतर भोजन करून कळमनुरी येथे परत आले होते. मात्र दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळ्यात भोजन केलेल्या नागरीकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे साडेचार वाजता एक रुग्ण कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्या रुग्णावर उपचार सुरु करण्यापूर्वीच इतर रुग्ण येण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद मेने यांनी तातडीने या प्रकाराची माहिती शासकिय रुग्णालयास दिली. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. गोपाल कदम यांनी तातडीने पथक तयार करून कळमनुरी येथे पाठविले. त्यानंतर डॉ.मेने व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार सुरु केले. रात्री 9वाजे पर्यंत उपजिल्हा रुग्णालयात 61 रुग्ण दाखल झाले होते. तर अद्यापही रुग्ण येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. तर 32 रुग्ण कळमनुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान या रुग्णांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.