आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात कायम ठेवला आहे. कर्जवाटपाच्या ४,३३७ कोटींपैकी केवळ १,५७५ कोटी रुपये म्हणजे सरासरी ३६ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांकडून १०० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला हंगाम सुरू झाला असताना अद्याप पिककर्ज वाटपाचे ५० टक्के उद्दिष्टही पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी बँकांकडून पीक कर्ज वाटप केले जाते. खरीप हंगामात मे महिन्यापूर्वी सर्व कर्ज वाटप होणे अपेक्षित असताना सप्टेंबर महिन्यापर्यंतही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. रब्बी हंगामातही हीच परिस्थिती कायम असते. त्यामुळे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. दरम्यान, या वर्षी खरीप हंगामात ११३२८ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ १३ लाख शेतकऱ्यांना ९५९८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ८४.७३ टक्के एवढी आहे. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन बँकांना १०० टक्के पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र खरिपाचा कर्जवाटपाचा गाडा ८४.७३ टक्क्यांवरच थांबला आहे.
दरम्यान, रब्बी हंगामात ४,३३७ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आता पीक उगवल्यानंतरही पीक कर्ज वाटपाचा आकडा ४० टक्क्यांपर्यंतही पोहोचला नाही. आतापर्यंत मराठवाड्यातील बँकांकडून १.८२ लाख शेतकऱ्यांना १५७५ कोटींचे म्हणजेच ३६.३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही कर्जवाटपात बँकांना हात आखडता घेतल्याचे चित्र कायम आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामात पेरणीसाठी बँकांकडून कर्ज मिळण्याची अपेक्षा फोल ठरू लागली आहे.
कर्जवाटपाची स्थिती अशी मराठवाड्यामध्ये रब्बी हंगामात राष्ट्रीयकृत बँकेने सर्वात जास्त म्हणजेच ४५ टक्के कर्ज वाटप केले आहे. एक लाख २९ हजार शेतकऱ्यांना १२६६ रुपयांचे कर्ज वाटप केले. यात ग्रामीण बँकेने १९ हजार २८८ शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सर्वात कमी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३,८०५ शेतकऱ्यांना १४४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
जिल्हानिहाय कर्जवाटप जिल्हा शेतकरी कर्जवाटप औरंगाबाद २१,३५१ १८५ जालना १९,८७९ १९० परभणी ४२,००५ ३२३ हिंगोली २८,५०२ २०४ लातूर ८०२५ ८८ उस्मानाबाद १२,११३ १४१ बीड २३,३२७ २२५ नांदेड २७,०७६ २१६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.