आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्हयातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील सुमारे 40 ते 50 गावांमध्ये आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच, नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.
जमिनीतून वारंवार आवाज
हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत, कळणनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात मागील 8 ते 10 वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत. भूगर्भातील सुक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
आज सकाळी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदारी, कंजारा, पुर, वसई, जामगव्हाण, जलालदाभा, काकडदाभा, वसमत तालुक्यातील पांगरा शिदे, वापटी, कळमनुरी तालुक्यातील बोथी, दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, असोला आदी प्रमुख गावांमध्ये भुकंपाचा धक्का जाणवला आहे.
भीतीमुळे गावकरी घराबाहेर
सकाळी साडेचार वाजता गावकरी साखर झोपेत असतांना जमिनीतून आवाज अन भुकंपामुळे गावकरी घाबरुन घराबाहेर पडले होते. मागील काही दिवसांत झालेल्या आवाजा पेक्षा आज सर्वात मोठा आवाज ऐकू आल्याचे पिंपळदरीचे गावकरी बापुराव घोंगडे यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या जमीनीतून आवाज अन भुकंपाच्या सौम्य धक्क्याची गावकऱ्यांना जणू सवयच झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी घाबरू नये
दरम्यान, आज पहाटे झालेल्या या भुकंपाची 3.6 रिश्टर स्केल एवढी नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या भुकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही नुकसान झाले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.