आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन शनिवारी ता. 21 चौथ्या दिवशी कायम आहे. संतप्त शेतकऱ्यांनी गोरेगाव जिंतूर मार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध केला.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा तसेच मागील वर्षीची 13 कोटी 89 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत, शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
मागील चार दिवसापासून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना शुक्रवारी काळे झेंडे दाखवले. तर भगवती येथे काही शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलना नंतरही प्रशासन जागे झाले नाही. यामुळे आज शेतकऱ्यांनी गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प केली. तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान सेनगाव तालुका कृषी अधिकारी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी शेतकऱ्यांची भेट घेतली. पिक विम्याच्या प्रश्नावर शासनाला कळविले आहे. विमा कंपनीकडून लवकरच योग्य निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करू असे मोघम उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकरी संतप्त झाले.
मागच्या वर्षीची ही रक्कम मिळाली नाही यावर्षीही तुटपुंजी विम्याची रक्कम मिळत आहे असे सांगत तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन फेटाळून लावली. त्यामुळे आता हे आंदोलन चांगलेच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी ही सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. तर पीक विम्याचे प्रश्नावर रविवारी सेनगाव गोरेगाव व हिंगोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.