आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत उडी मारुन आत्महत्या:हिंगोलीतील घटना, SBIचे दीड लाखाचे होते कर्ज

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची विहीरीत उडी मारून आत्महत्या, सकाळी सापडला मृतदेह, स्टेट बँकेचे होते १.५० लाखांचे कर्ज

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. रविवारी (ता. १२) पहाटे सहा वाजता ही घटना उघडकीस आली. निळकंठ पुंडलीकराव पतंगे (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पिकांचेही नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील शेतकरी निळकंठ पतंगे यांच्याकडे पाच एकर शेत जमीन आहे. या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा आखाडा बाळापूर येथून १.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले तर रब्बीमधील हरभऱ्याचे पिकही जेमतेमच आले. सध्या शेतात उन्हाळी सोयाबीनही म्हणावे तसे आले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती.

पायावर शस्त्रक्रिया करायची होती

या सोबतच पतंगे यांच्या पायावर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. त्यासाठी ५ लाख रुपयांचा खर्च येणार होता. बँकेचे कर्ज व शस्त्रक्रियेचा खर्च करावा करावा यामुळे ते अस्वस्थ होते. दोन दिवसांपुर्वी ते रात्री बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला होता. त्यांचे दुचाकी वाहन व चष्मा शेतातील विहीरीजवळ सापडल्यामुळे गावकऱ्यांनी शनिवारी पहाटे पासून त्यांचा विहीरीत शोध सुरु केला होता. दोन ते तीन विद्युतपंपाद्वारे विहीरीतील पाणी काढण्यास सुरवात केली. त्यानंतर आज पहाटे सहा वाजता त्यांचा मृतदेह विहीरीत आढळून आला.

मागे दोन मुले, सुना, नातवंडे

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत निळकंठ पतंगे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...