आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात काँग्रेस मधील अंतर्गत कलह सुरूच असून कुरघोडीच्या राजकारणामध्ये माजी आमदारांना डावलून जिल्हा परिषद गटनेते दिलीप देसाई यांना काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच दिले आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर उफाळून आला आहे. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व विद्यमान आमदार प्रज्ञा सातव यांच्या गटाचे राजकारण सुरू असताना माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांना पक्षातून बाजूला ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
त्यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जागा मागील चार ते पाच महिन्यापासून रिक्त आहे. या जागेवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष पद माजी आमदार संतोष टारफे यांना द्यावे असा सूर पदाधिकारी कार्यकर्त्यातून उमटू लागला होता. तर दुसरीकडे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या माध्यमातून काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते दिलीप देसाई तसेच सुरेश सराफ यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये होती.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष पदावर दिलीप देसाई यांची नियुक्ती केली. त्यामुळे माजी आमदार टारफे व सुरेश सराफ आपोआपच बाजूला पडले गेले. माजी आमदार टारफे यांना डावलण्यात आल्यामुळे काँग्रेसमधील त्यांना मानणाऱ्या गटातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान अंतर्गत कलाहामध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे आव्हान देसाई यांच्यासमोर उभे आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता देसाई काय भुमिका घेणार यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.