आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारामध्ये पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडून सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी (ता. 12) घडली असून वडीलांसोबत शेतात गेल्यानंतर नदी पात्रात पाणी पिताना त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोडखा येथील गुलाब अंकुश राठोड हे गुरुवारी सकाळी पूर्णा नदीच्या पात्रापलीकडे असलेल्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा गोपाल राठोड ( 10 ) व मुलगी विशाखा राठोड (7) हे दोघेही सोबत होते.
गुलाब राठोड शेंगा काढण्यात व्यस्त असताना गोपाल व विशाखा पूर्णा नदीच्या पात्राकडे आले. यावेळी नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यातील पाणी पीत असताना दोघेही पाय घसरून पाण्यात पडले. मात्र त्या परिसरात कोणी नसल्यामुळे गोपालने आरडाओरडा करून देखील कोणालाही आवाज ऐकू आला नाही.
दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन्ही मुले शेतात नसल्याने गुलाब राठोड व इतर शेतकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाहणी केली असता खड्ड्यातील पाण्यात विशाखाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गोपालचा शोध सुरू करण्यात आला सायंकाळी त्याचा मृतदेह देखील पायातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद झाली नव्हती.
दोनच मुलं तीसुद्धा गेली!
गुलाब राठोड यांना गोपाल व विशाखा ही दोनच आपत्ये होती. गोपाल हा इयत्ता पाचवी वर्गात तर विशाखा ही इयत्ता दुसरी वर्गात शिक्षण घेत होते. या दोघांच्याही मृत्यूमुळे राठोड कुटुंबियासह बोडखा गावावर शोककळा पसरली असून हळहळही व्यक्त होत आहे.
पत्नीही गंभीर आजारी
बोडखा येथील गुलाब राठोड यांच्या पत्नी देखील गंभीर आजारी आहेत. घरी उदरनिर्वाहासाठी रोजमजुरी करावी लागते. त्यामुळे ते पत्नीला घरी ठेवून मुलांना सोबत घेऊन मजूरीच्या कामाने गेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.