आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील कांडली येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (१२ मार्च) पहाटे ६ वाजता उघडकीस आली. नीळकंठ पुंडलिकराव पतंगे (४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील शेतकरी नीळकंठ पतंगे यांच्याकडे पाच एकर शेत जमीन आहे.
या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आखाडा बाळापूर येथून १.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले. तर रब्बीमधील हरभऱ्याचे पीकही जेमतेमच आले. तर सध्या शेतात उन्हाळी सोयाबीनही म्हणावे तसे आलेच नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. या सोबतच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असून त्यासाठी ५ लाखांचा खर्च येणार होता. बँकेचे कर्ज व शस्त्रक्रियेचा खर्च करावा करावा यामुळे ते अस्वस्थ होते. दोन दिवसांपूर्वी ते रात्री बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यांचे दुचाकी वाहन व चष्मा शेतातील विहिरीजवळ सापडल्यामुळे गावकऱ्यांनी शनिवारी पहाटे पासून त्यांचा विहिरीत शोध सुरू केला होता. दोन ते तीन विद्युत पंपांद्वारे विहिरीतील पाणी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज पहाटे सहा वाजता त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत नीळकंठ पतंगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.