आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकत्तलीसाठी जनावरे नेत असलेला ट्रक संतप्त नागरिकांनी पेटवून दिल्याची घटना शहरात ३१ मे च्या मध्यरात्रीचे सुमारास घडली. नांदुरा-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील दिवाणी न्यायालयासमोर हा प्रकार घडला. या घटनेमुळे शहर व परिसरात तणाव निर्माण झाला असून वरिष्ठ पोलिस अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ट्रक पेटवून देण्यापूर्वी नागरिकांनी ट्रकमधील गायींना खाली काढले असता गुदमरल्याने आठ गायींचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री नांदुऱ्याकडून एम. एच. ०४/ एच ई /१८९० या क्रमांकाचा ट्रक २५ गोवंशाना घेवून मलकापूरकडे जात होता. शहरातील दिवाणी न्यायालयासमोर बिघाड झाल्याने हा ट्रक बंद पडला. परिसरात नागरिक जमा झाल्याने चालक आणि वाहकाने घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ट्रकमध्ये पाहिले असता त्यामध्ये २५ जनावरे कोंबून भरल्याचे दिसून आले. नागरिकांनी सर्व गायींना ट्रकच्या बाहेर काढले असता आठ गायींचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे त्यांना दिसून आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करून ट्रक विझवण्यात आला. भर रस्त्यात हा प्रकार घडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प पडली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दांगाकाबू पथक व अतिरिक्त पोलिस दल शहरात तैनात करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत. दरम्यान, आज १ जून रोजी पहाटे ट्रक चालक व वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदुरा पोलिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.