आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळात रिक्षाची चाके थांबली. मुलाची नोकरी गेली अन् मुलीचा घटस्फोट झाला. नातेवाइकांनीही वाऱ्यावर सोडल्याने अडचणीत सापडलेल्या भुसावळातील एकाच कुटुंबातील चौघांनी उंदीर मारण्याचे आैषध प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. भुसावळात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (६०), पत्नी लताबाई (५२), मुलगी प्रेरणा (२८) व मुलगा चेतन (२७) हे राहतात. शुक्रवारी दिवसभर त्यांचे घर बंद असल्याने रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर परिवारातील चारही सदस्य बेशुद्ध आढळले. यानंतर पोलिस व रहिवाशांनी रात्री १२ वाजेच्या सुमारास अत्यवस्थ चौघांना डॉ. मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लताबाई भोळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्यातही त्यांनी विवंचनेचा मुद्दा मांडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.