आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ तालुक्यात झालेल्या अल्प पावसानंतर सुमारे ८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. मात्र, पावसाने ओढ दिल्याने यापैकी निम्म्या म्हणजेच ४ हजार हेक्टरवर दुबार पेरणीच्या संकटाचे ढग घोंगावत आहे. दोन दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरणी अटळ असल्याची माहिती जाणकार शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे पावसाअभावी बागायती कपाशीची वाढ खुंटली आहे.
भुसावळ तालुक्यात १२ जून रोजी पिंपळगाव मंडळात सुमारे १० ते १२ मिमी पाऊस झाला. यानंतर १३ जूनला तालुक्यात ८.६ मिमी पाऊस झाला. १९ जून व मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. बऱ्याच ठिकाणी धूळपेरणी देखील करण्यात आली आहे. जमिनीत पुरेशी ओल नसताना कोरडवाहू क्षेत्रात झालेली पेरणी आता पाऊस लांबल्याने संकटात सापडली आहे. तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर बागायती कापसाची लागवड झाली आहे. सिंचनाची सुविधा असल्याने हे पीक तग धरुन आहे.
पावसानंतर इतर पेरणी तालुक्यात आतापर्यंत केवळ कपाशीची लागवड झाली आहे. दमदार पाऊस झाल्यानंतर तसेच जमिनीत किमान सहा इंच ओलावा झाल्यानंतर ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर पेरणी होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.