आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सावदा ते फैजपूरदरम्यान औद्योगिक वसाहतीजवळील नाले भराव टाकून बंद केले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पूर स्थिती आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा खुला करावा, अशी मागणी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोजकुमार पाटील आणि व्हाइस चेअरमन पुंडलिक पाटील यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे केली. औद्योगिक वसाहतीला लागून पूर्व बाजूला उत्तर-दक्षिण प्रवाहीत असलेला नाला आहे. हा नाला शेतातील पाणी निघण्यासाठी अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे. त्याचा प्रभाव विस्कळीत होऊ नये म्हणून बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर शासनाने ६५ ते ७० फूट लांबीचा पूल बांधला आहे. या पुलाखालून नाल्यातील पाण्याचा निचरा होतो. मात्र, काही दिवसांपूर्वी या महामार्गावरील पुलाचे दक्षिणेकडील नाल्यामध्ये कुणीतरी भर टाकून ती जागा वाणिज्य वापरात घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नाल्याचा प्रवाह बंद झाला. औद्योगिक वसाहतीच्या उत्तर व पूर्व भागातील शेती व रस्त्यावरील पावसाचे पाणी उद्योजकांचा प्लॉटमध्ये तुंबत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे रस्ते खराब होऊन दळणवळणाला त्रास सहन करावा लागतो, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.