आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ दीपनगर औष्णिक केंद्रातील ६६० मेगावॅट प्रकल्पातून नवीन वर्षातील जून महिन्यापासून प्रत्यक्ष वीजनिर्मिती होईल. या प्रकल्पातून राज्याला दररोज १५.८४० दशलक्ष युनिट वीजपुरवठा होईल. राज्याची औष्णिक वीजनिर्मितीची सध्याची क्षमता १० हजार १७० मेगावॅट आहे. दीनगरातील प्रकल्प कार्यान्वित होताच ती १० हजार ८३० मेगावॅट होईल. राज्यात औद्योगिक व कृषी क्षेत्रातील विजेची गरज भरुन काढण्यासाठी ६६० मेगावॅट प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. दीपनगर ६६० मेगावॅट प्रकल्पाची बॉयलर ड्रेनेबल हायड्रोलिक चाचणी यशस्वी झाली. आता स्टेशन ट्रान्स्फॉर्मर चार्जिंग व बॉयलर लाईटअप प्रक्रिया सुरु आहे. या संचांतून कोणत्याही स्थितीत जून २०२३पासून वीजनिर्मिती व्हावी या दृष्टीने हे नियोजन आहे. कारण, ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पातून जून २०२२ पर्यंत वीजनिर्मितीचे नियोजन होते. पण, कोरोनाच्या दोन लॉकडाउनमुळे आठ ते दहा महिने काम रेंगाळले. लॉकडाउन उठल्यावरही कुशल कामगारांची टंचाई असल्याने प्रकल्पाला विलंब झाला. तो आता जून २०२३ मध्ये कार्यान्वित होऊन जुलैपासून व्यावसायिक वीजनिर्मिती होईल. उत्तर महाराष्ट्रातील महानिर्मितीच्या या एकमेव ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पातून दररोज १५.८४० दशलक्ष युनिट वीजपुरवठा होईल. यामुळे कृषी व औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळेल.
२८ दिवसांची चाचणी १ वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महानिर्मितीकडून त्याची २८ दिवस चाचणी होईल. या चाचणीनंतर प्रकल्पातून व्यावसायिक वीजनिर्मिती होईल. या प्रकल्पाची चाचणी जूनमध्ये होऊन जुलै महिन्यात व्यावसायिक पद्धतीने वीजनिर्मितीचे नियोजन आहे. याअनुषंगाने सध्या तयारी सुरु असल्याची माहिती दीपनगर ६६० मेगावॅट प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी दिली.
दीपनगर केंद्राची क्षमता होईल १,८७० मेगावॅट २ दीपनगर केंद्रात सध्या २१० मेगावॅटचा संच क्रमांक ३ आणि ५०० मेगावॅटचे दोन संच क्रमांक ४ आणि ५ असे एकूण तीन संच कार्यान्वित आहेत. राज्याला या तिन्ही संचांतून १२१० मेगावॅट वीजपुरवठा होतो. आता ६६० मेगावॅट प्रकल्पानंतर या केंद्राची क्षमता १,८७० मेगावॅट होणार आहे. आगामी काळात दीपनगर यामुळे चंद्रपूर व कोराडीनंतर सुपर पॉवर स्टेशनच्या पंक्तीत बसेल.
मार्चपर्यंत पूर्ण होणार भुसावळ-जळगावदरम्यान चाैथा रेल्वे मार्ग भुसावळ ते जळगाव या १४ किमी अंतरात २६१ कोटी रूपये खर्चाच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापैकी भादली ते जळगाव हा टप्पा सुरू झाला. आता भुसावळ ते भादली हा टप्पा मार्च २०२३ पर्यंत वाहतुकीला खुला होणार आहे. हा संपूर्ण मार्ग वापरात आल्यावर भुसावळ विभागातून पश्चिमेकडे म्हणजेच गुजरातकडे होणारे रेल्वे दळणवळण वाढेल. प्रवासी गाड्या वेळेवर धावतील.
पाचोरा : हिवरा नदीवर पांचाळेश्वर पुलाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे पाचोरा शहरातील हिवरा नदी पात्रात ७ कोटी रुपये खर्चातून पांचाळेश्वर मंदिराजवळील पुलाचे काम नवीन वर्षात पूर्ण होईल. गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुलाची उंची कमी असल्याने हिवरा नदीला आलेल्या पुरात दोन नागरिकांना जिवाला मुकावे लागले होते. आता नवीन पूल पाचोरा शहरासह व तालुक्यातील सारोळा बुद्रुक, वाघुलखेडा, खडकदेवळा खुर्द व डोंगरगाव येथील विद्यार्थी, नागरिक, शेतकऱ्यांची समस्या सुटेल.
अमळनेर : गरिबांच्या मुलांनाही मिळणार डिजिटल शिक्षण अमळनेर आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी प्रताप हायस्कूल शाळेचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे यांनी डिजिटल क्लासरूमची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मुख्याध्यापिका पी. बी. पाटील यांनी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. आता डिजिटल क्लास रूम सज्ज झाला आहे. नवीन वर्षात शाळेतील सर्वसामान्यांच्या मुलांना मोफत डिजिटल शिक्षण मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.