आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण कंपनीने शहरात मान्सूनपूर्व कामात वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांची छाटणी सुरू केली आहे. लोंबकळणाऱ्या वीज तारांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. काही ठिकाणी या तारा जमिनीपासून केवळ १० ते १२ फूट उंचीवर आहेत. म्हणजेच मृत्यू अवघ्या हाताच्या अंतरावर आहे. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या तारा तुटल्यास अपघात होऊ शकतो. शहरातील गंगाराम प्लॉट, रिंग रोड, सिंधी कॉलनी, हनुमान नगर, भाग्यश्री विहार, खडकारोड, मुस्लिम कॉलनी, विकास कॉलनी भाग, हिरानगर या भागात ही समस्या तीव्र आहे. यापूर्वी जामनेर रोड परिसरातील दुर्घटनेत एका तरुणाचा बळी गेला होता. मात्र, वारंवार तक्रारी होऊनही महावितरण हा प्रश्न सोडवत नाही. नागरिकांनी महावितरणकडे तक्रार केल्यास कर्मचारी हे प्रकार ठेकेदाराची चूक असल्याचे सांगून मोकळे होतात.
आयोध्या नगर : हनुमान मंदिराजवळील भागात तारा केवळ १० ते ११ फूट उंचीवर आहेत. महावितरणकडे तक्रार केली. मात्र, ही ठेकेदाराची चूक असल्याचे सांगून कानावर हात ठेवले जातात. भाग्यश्री विहार : साईबाबा मंदिराजवळील भागात वीज तारा जीर्ण झाल्या आहेत. काही घरांच्या गच्चीला स्पर्श करुन गेल्या आहेत. ११ ते १२ फुटांवर असलेल्या या तारांमुळे धोका आहे. हनुमान नगर : पालिकेच्या गार्डन समोरील भागात ही समस्या आहे. सायंकाळी या ठिकाणी लहान मुलांची गर्दी होते. लोंबकळणाऱ्या तारा पावसाळ्यात तुटल्या तर जिवित हानी होईल. गंगाराम प्लॉट : सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या मागील भागात उंच उडी मारुन थेट हात पुरेल इतक्या उंचीवर वीज तारा आहेत. या भागातून जाताना नागरिकांना भिती वाटते. सिंधी कॉलनी : इमारतींना स्पर्श करुन जाणाऱ्या वीजतारांमुळे पावसाळ्यात संपूर्ण इमारतीत वीजप्रवाह उतरु शकतो. संपूर्ण कॉलनी भागात किमान १८ ठिकाणी ही समस्या आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.