आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ६८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते रविवारी होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. शेंदुर्णी नगरपंचायतीने गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे व केंद्राकडे वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. पाण्याचे जुने स्त्रोत कायम ठेवून वाघूर धरणावरून पाणीपुरवठा होण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यानुसार योजनेचे काम होणार आहे.
सौर उर्जेवर चालणारी महाराष्ट्रातील ही महत्वकांक्षी योजना अमृत दोन म्हणून केंद्र सरकारच्या योजनेत मान्य झाली. सदर योजना पूर्ण करण्यासाठी वर्षभराची मुदत आहे. योजनेचे भूमिपूजन नगरपंचायत प्रांगणात कमल किसन नगर येथे रविवारी दुपारी तीन वाजता होणार आहे.
तसेच महावीरनगर येथे जलकुंभाचे भूमी पूजन, वाडी दरवाजा येथे ७० लाखाचे महिला व पुरुष शौचालयाचे लोकार्पण, वाडी तलावाचे दोन कोटींचे सुशोभिकरण, वाडी दरवाजा हाळजवळ रस्ता भूमिपूजन, सोयगाव रोडवरील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण व तसेच नवीन टाकीचे भूमिपूजन, बारी मंगल कार्यालयातील शौचालय व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण याच दिवशी होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष विजया खलसे असतील.
कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजप नेते उत्तम थोरात, अमृत खलसे, चंदू बाविस्कर, नारायण गुजर उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नगराध्यक्ष विजया खलसे, उपनगराध्यक्ष गणेश पाटील आदींनी केले आहे. बहुप्रतिक्षित पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागल्यानंतर, शेंदुर्णीतील पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लागणार आहे. आगामी काळातील शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन, नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. त्यामुळे पुढील अनेक दशके टंचाईपासून मुक्तता मिळणार आहे.
दररोज मिळेल पाणी
शेंदुर्णीत सध्या आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरात दररोज पाणीपुरवठा शक्य होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.