आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहाळ खान्देशात गेल्या तीन-चार दिवसांपासून मार्च महिन्यातच ‘मे हिट’चा तडाखा जाणवू लागला आहे. चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील तापमानाचा पाराही ४० अंशावर पोहचला असून वाढत्या उन्हाच्या चटक्यांमुळे दुपारनंतर गावातील मुख्य रस्ते निर्मनुष्य होत आहेत. त्यामुळे जणू अघोषित संचारबंदी लागू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बहाळ परिसरातही तापमान दोन दिवसांपासून अचानक वाढले आहे. मात्र ऋषिपांथा येथे वाहणाऱ्या गिरणा नदीला पाणी असल्याने लहान मुले, तरुण व प्राण्यांनाही उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून पोहण्याचा आनंद घेताना पहावयास मिळाले. वाढत्या तापमानाचा परिणाम परिसरातील दैनंदिन जनजीवनावर झाला. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून पंखे व कुलरने देखील समाधान होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. यापूर्वी गावातील तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सियस होते. त्यात वाढ होऊन ते आता ४०-४२ अंशावर गेल्याने उन्हाचे चटके वाढले आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी व्यापारी व्यवसाय बंद ठेऊन आराम करणे पसंत करत आहेत. परिसरात वाढलेल्या उष्णतेमुळे ‘मे हिट’चा तडाखा आताच जाणवू लागला आहे.
सकाळी, संध्याकाळी शेतीकामांना प्राधान्य शेतीचे कामे डोक्यावर असून तापमानाचा पारा चढत असल्याने भल्या पहाटे व सायंकाळच्या वेळी शेतातील कामे केली जात आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक वृक्षांच्या सावलीची मदत घेताना दिसत आहेत. सूर्याची दाहकता असह्य झाल्याने नागरिक दिवसा घराबाहेर जाणे टाळत आहे. तर परिसरातील रस्तेही निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. शेतातील नांगरटीसह मशागतीची कामे सकाळी व संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात केली जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.