आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल संकट:जामनेर तालुक्यातील भूजल पातळीत घट‎

जामनेर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून‎ तापमानात प्रचंड वाढ झाली‎ आहे. त्याचबरोबर भूजल‎ पातळीत अचानक घट झाल्याने‎ हाता-तोंडाशी आलेली उभी‎ पिके सोडून देण्याची‎ शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.‎ आधीच कृषी मालाला नसल्याने‎ भावाबरोबरच हातचे वाया‎ जाणारे पीक पाहून शेतकरी‎ कासावीस झाला आहे.‎ जिल्ह्यात सर्वाधिक धरणांचा‎ तालुका म्हणून जामनेरची नोंद‎ आहे. साहजिकच उपलब्ध‎ पाणीसाठा पाहता तालुक्यात रब्बी‎ हंगाम ही मोठ्या प्रमाणावर‎ घेतला जातो. त्यात यावर्षी‎ मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस‎ पाहता अनेकांनी रब्बीच्या‎ पिकांची पेरणी केलेली आहे.‎

मात्र, वातावरणातील होणारे‎ बदल, काही दिवसांपासून‎ तापमानात झालेली प्रचंड वाढ‎ पाहता जल-पातळीत अचानक‎ घट झाली आहे. लागवड‎ केलेल्या पिकांना देण्यासाठी‎ पाणी पुरत नसल्याने शेतकऱ्यांवर‎ उभी पिके सोडून देण्याची वेळ‎ आली आहे. थोड्या दिवसांसाठी‎ लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने‎ शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी‎ आलेला घास हिरावला जात‎ असल्याचे चित्र असल्याने‎ शेतकरी हवालदिल झाला अाहे.‎

तालुक्यात‎ सर्वाधिक‎ बागायती क्षेत्र‎
जामनेर तालुक्यात ४९ धरणे आहेत. त्यामुळे हा पुरेसा पाणीसाठा रब्बीसाठी ताे‎ फायदेशीर ठरताे. १ लाख ६ हजार हेक्टर पेरणी लायक क्षेत्र असून तब्बल ३० ते ३२‎ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे पीक घेतले जाते. यंदाही सुमारे ३० हजार हेक्टर‎ बागायती क्षेत्र असून अचानक जल-पातळी घटल्याने उभी पिके धोक्यात आली.‎

आठ दिवसांत घटली पाणीपातळी ...‎
या वर्षी झालेला दमदार पाऊस पाहता बहुतांश विहिरीचा‎ पाणीसाठा बऱ्यापैकी वाढला होता. मात्र, गेल्या ८ दिवसात‎ अचानक विहिरींची जल-पातळी घटली. ७ ते ८ तास पाणी‎ पुरवू शकणाऱ्या विहिरी अवघ्या २ ते अडीच तासांवर येऊन‎ थांबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला अर्धवट पीक सोडून‎ देण्याची वेळ आली आहे.‎

पाण्याचा अपव्यय करणे पडले महाग‎
विहिरीत असलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने शेतकऱ्यांनी‎ रब्बी पिकांबरोबरच कपाशीला सुद्धा फरदड घेण्याच्या दृष्टीने‎ पाणी दिले. वास्तविक फरदड निर्मूलन होणे गरजेचे होते, मात्र‎ तसे झाले नाही. शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेण्यासाठी‎ कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी दिले. त्याचा विपरित परिणाम‎ होऊन उपसा वाढल्याने जल-पातळी घटली. अशाच‎ कारणांमुळे शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आल्याच्या भावना‎ काही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.‎

निम्मे पीक सोडले‎
पावसाळा जास्त झाल्याने‎ विहिरीला भरपूर पाणी राहिल, असा‎ अंदाज होता. त्यामुळे १२ एकरात‎ रब्बीच्या पिकांची पेरणी केली हाेती.‎ यात गहू, मका, ज्वारी या पिकांची‎ लागवड केलेली होती. मात्र, गेल्या‎ आठ ते दहा दिवसात अचानक जल‎ पातळी घटल्याने निम्म्यापेक्षा जास्त‎ पिके सोडून देत उर्वरित पिके‎ वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.‎ - भागवत वाणी, शेतकरी, फत्तेपूर‎

बातम्या आणखी आहेत...