आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोयगाव ग्रामपंचायतीत १ कोटी ८० लाख रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सेवानिवृत्त मंडळ अधिकारी एस. डी. पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. त्या संदर्भात चौकशी करून भ्रष्टाचार झाला नसल्याचा अहवाल पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात गावात येऊन कुठलीही चौकशी न करता अहवाल देऊन भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदार सुरेंद्रसिंग पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. सन २०१६-१७ ते २०२१ या कालावधीत सरपंच कौसल्याबाई महाले व त्यांचे पुत्र गजानन पाटील यांनी मिळून १४व्या वित्त आयोगासह प्राप्त निधीतून तब्बल १ कोटी ८० लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण जिल्हा परिषदेशी संबंधित असल्याने या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या आदेशावरून जामनेर पंचायत समितीतर्फे चौकशी करण्यात आली. चौकशीअंती कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. मात्र, आपल्या तक्रारींची प्रत्यक्ष गावात येऊन कुठल्याही पदाधिकारी किंवा तक्रारदाराला बोलावून प्रत्यक्ष कामांची चौकशी न करता कागदोपत्री चौकशी करून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप सुरेंद्रसिंग पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. याबाबत आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही दिलेल्या पत्राची प्रत ‘दिव्य मराठी’ला दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.