आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात रस्त्यांची कामे करण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला जातो आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. कामाची गुणवत्ता तपासल्यानंतर याविषयीचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवावा. तोपर्यंत ठेकेदारांना बिल देण्याची घाई करू नये, अशी सूचना महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली. बैठकीत ५४ कोटींतून होणाऱ्या रस्त्यांचे काम करण्यासाठी प्राप्त झालेल्या दरांना मंजुरी देण्यात आली. महापालिका सभागृहात सोमवारी दुपारी चार वाजता बैठक झाली. सभापती किरण कुलेवार, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक सुनील बैसाणे म्हणाले की, प्रत्येक रस्त्याच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. निविदेतील अटी, शर्तीनुसार काम झाले की नाही यासह कामाच्या गुणवत्तेची तपासणी होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कामासाठी भाजपने कोट्यवधी रुपये मंजूर करून आणले आहे. या निधीचा योग्य विनियोग व्हावा. ठेकेदार रस्त्यांची काम मनमानी पद्धतीने करतात.
या प्रकाराला चाप लावावा.ठेकेदाराला बिल देण्यापूर्वी अहवाल स्थायी समितीच्या सभेत ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक नरेश चौधरी यांनीही रस्त्यांचे काम दर्जेदार झाले पाहिजे. तक्रारीला संधी मिळता कामा नये, अशी मागणी केली. सभेच्या विषय पत्रिकेवर चर्चेसाठी ६४ रस्त्याच्या कामांचे दर मंजूर करण्याचे दोन विषय होते. चर्चेनंतर हे विषय मंजूर झाले.
मनपात नागरिकांसाठी पाण्याची सोयच नाही
महापालिकेत अनेक नागरिक कामासाठी येतात. पण नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मनपात असलेला वॉटर कुुलरही बंद आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वॉटर कुलर तातडीने दुरुस्त करून सुरू करावा, अशी सूचना सभापती कुलेवार यांनी केली. त्यानुसार वॉटर कुलरची दुरुस्त करण्याची सूचना झाली.
कोरोनाची लसच उपलब्ध नाही
नगरसेवक सुनील बैसाणे म्हणाले की, शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या वेेळी नगरसेविका फातेमा अन्सारी यांनी हज यात्रेकरूंना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी केली. त्यावर आरोग्याधिकाऱ्यांनी राज्यात लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. याविषयावर बैठक होईल.
अधिकारी पुन्हा होते अनुपस्थित
स्थायी समितीच्या बैठकीला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी सूचना सभापती किरण कुलेवार यांनी केली होती. त्यानंतरही सोमवारी झालेल्या बैठकीला लेखाधिकारी गजानन पाटील उपस्थित नव्हते. याविषयी विचारणा केल्यावर आयुक्त देविदास टेकाळे यांनी काही कारणामुळे येऊ शकत नाही असा मेजेस लेखाधिकाऱ्यांनी पाठवला असल्याचे सांगितले. त्यावर सभापती कुलेवार यांनी नियमाप्रमाणे हे योग्य आहे का अशी विचारणा केली. त्यावर आयुक्त देविदास टेकाळे यांनी लेखाधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
आता तक्रारी निवारणासाठी कर्मचारी नेमणार
शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधासंदर्भात विविध तक्रारी असतात. या तक्रारी स्वीकारण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी सूचना सभापती किरण कुलेवार यांनी आयुक्त टेकाळे यांना केली. तसेच कोणतीही तक्रार दोन दिवसांत सुटली पाहिजे. याविषयीचा अहवाल स्थायी समितीच्या सभेत सादर करावा, अशी सूचना सभापती किरण कुलेवार यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.