आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे ते सोलापूर महामार्गावरील धुळे ते चाळीसगाव व पुढे कन्नड घाटापर्यंतचे रस्ता अरुंद असल्याने प्रवास नकोसा होतो. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी होती. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून काम सुरू झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भारतमाला परियोजनेतून हायब्रीड एन्युटीतंर्गत हे काम होते आहे. हे काम ९१० दिवस म्हणजेच अडीच वर्षात पूर्ण होईल. सद्यःस्थितीत गरताडपासून पुढे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर धुळे ते चाळीसगाव हा दीड तासाचा प्रवास एक तासात पूर्ण होईल.
धुळे ते सोलापूर महामार्गाच्या चौपदीकरणाचा शेवटचा टप्पा बोढरे ता.चाळीसगाव ते धुळ्यापर्यंत आहे. यापूर्वी कन्नडपासून पुढे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण बोढरे ते धुळ्यापर्यंतचे काम रखडले होते. हा रस्ता अरुंद असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी होती होती. त्यानूसार जानेवारी महिन्यापासून धुळे ते चाळीसगाव आणि पुढे बोढरेपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरु झाले आहे.
सद्य:स्थितीत गरताड गावापासून चाळीसगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्ता समतल करण्याचे काम सुरु आहे. हे काम करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. महामार्गावरील विंचूर येथील बोरी नदीवरील पूल, चाळीसगाव बायपास, मालेगाव बायपास येथे पुलाची रुंदी वाढेल. मेहुणबारे बायपास, चाळीसगाव रोड-मालेगाव रोड, शिरूड चौफुली येथे अंडरपास होईल. त्यामुळे महामार्गावर अपघात होणार नाही. रस्त्याचे काम सन २०२४ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
६७ किलोमीटर अंतर, एक टोलनाका, बायपासही
धुळे ते बोढरे हे अंतर ६७.२३ किलोमीटर आहे. या टप्प्याच्या कामासाठी १ हजार ७ कोटी रूपये मंजूर झाले आहे. अहमदाबाद येथील कलाथिया इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शनतर्फे चौपदरीकरण केले जाते आहे. महामार्गावर एका ठिकाणी टोल नाका असेल. तसेच चार मोठे पुल, तीन अंडरपास असतील. पाटणादेवी, वालझिरी चौफुली बायपास, जुनवणे गावाजवळ आणि गरताड जवळ लहान अंडरपास असेल.
विना अडथळा काम होणार
धुळे ते सोलापूर महामार्गाच्या धुळे ते बोढरे या टप्प्याचे काम २९ जानेवारीपासून सुरु झाले आहे. अडीच वर्षात काम पूर्ण होईल. हे काम विना अडथळा सुरू राहील.
रवींद्र इंगोले, प्रकल्प अधिकारी
शिरुड चौफुली अतिक्रमण मुक्तमुळे अपघात कमी
महामार्गावरील शिरूड चौफुलीवर असलेले सर्व हटवण्यात आले आहे. त्यामुळे ही चौफुली मोकळी झाली आहे. महामार्गावरील अपघात स्पॉट असलेल्या गरताड बारीतील टेकडी भूईसपाट केली जाते आहे. ज्या ठिकाणी धोकादायक वळण आहे. तेथे उपाययोजना केल्या जाता आहे. तसेच एकेरी पुलांची रुंदी दुहेरी होणार असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.